
रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर नाही, धनशक्तीने लढल्या गेल्या!-सुहास खंडागळे
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक आधी येथील समस्यांबाबत नागरिकांत, तरुणांमध्ये प्रचंड संताप होता,आरोग्य, शिक्षण,स्थलांतर,बेरोजगारी, पायाभूत सुविधा, रस्ते,खड्डे,पाणी टंचाई अशा अनेक प्रश्नावर येथील नागरिक प्रचंड नाराज होते,मात्र मतदानात तो संताप दिसला नाही.नाराजी दिसली नाही.याचाच अर्थ जिल्ह्यात निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढल्या गेल्याच नाहीत तर जिल्ह्यात निवडणुका या धनशक्तीच्या जोरावर लढल्या गेल्या आणि जिंकल्या गेल्या असे स्पष्ट मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.
गाव विकास समिती मार्फत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात खंडागळे यांनी म्हटले आहे की,विरोधी पक्षात सुद्धा धनशक्ती चा वापर मोठ्या प्रमाणात झाला,परिणामी जिल्ह्यात ज्या ठिकाणी परिवर्तन झाले ते धनशक्ती च्या जोरावरच झाले.गावागावात वाड्या वस्त्या खरेदी करण्यासाठी चढाओढ लागली होती हे दुर्दैवी असून चाकरमानी मतदार यांनाही येण्याजाण्याचा खर्च घेऊन मतदान करणे ग्रामीण भागाच्या विकासाला मारक असल्याचे खंडागळे यांनी म्हटले आहे. कोकणात ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जातात ती पद्धत पाहिली तर आणखी काही वर्षे कोकणचा विकास होणार नाही,कारण येथे विकासाचे मुद्दे महत्त्वाचे नाहीत तर गाव पुढारी आणि गावागावात असणारे राजकीय प्रस्थापित लोक यांच्या हातात ग्रामीण भागातील नागरिकांची मते एकवटली आहेत.खेड्यातील लोकशाही गाव पुढारी,मुंबई,सांगली,कोल्हापूर मंडळे यांच्या हातात बांधली गेली आहे. हे प्रस्थापित लोक,गाव पुढारी ज्यांच्या बाजूने जातात त्या बाजूने गावे,वाड्या वळतात,याला आपण लोकांनी केलेले परिवर्तन कसे म्हणायचे?असा सवाल खंडागळे यांनी या पत्रकाद्वारे विचारला आहे. कोकणात निवडणुकीत सामान्य माणसाची केवळ दिशाभूल होते आणि त्यातूनच येथील समस्या न सुटण्याची तरतूद केली जाते.गावागावात ज्या पद्धतीने शेवटच्या काही दिवसांत वाड्या,गाव काही ठराविक लोकांच्या सांगण्यावरून ,कोणत्याही स्वरूपाचे आमिष दाखवून एकगठ्ठा मते फिरवली जातात याला आपण लोकशाही कशी म्हणायची?जर अशी एकगठ्ठा मते टाकून कोकणच्या विकास झाला असता तर तो याआधी अशी पद्धत वापरली जात असताना का झाला नाही?एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य माणसाचा विकास स्वार्थी गाव पुढारी आणि धनशक्ती यामुळे रखडला आहे असा सणसणीत आरोप सुहास खंडागळे यांनी केला आहे.येथील तरुणांना धनशक्ती आणि गाव पुढाऱ्यांची बंधने तोडुन ग्रामीन भागाच्या विकासासाठी एकजूट व्हावं लागेल असे आवाहन सुहास खंडागळे यांनी केले आहे.येणाऱ्या काळात गावागावात जाऊन सामान्य माणसाला त्याच्या प्रश्नाबाबत जागरूक करावे लागेल.आपले प्रश्नच सामान्य जनतेला माहिती होऊ दिले जात नसल्याने लबाडी करणाऱ्या राजकीय एजंट लोकांचे फावत आहे असे खंडागळे यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
www.konkantoday.com