‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

प्रतिनिधी,
मुंबई, ३० जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचे कौतुक करत, हे अभियान युवकांना जागरूक, सक्षम आणि नशामुक्त समाज घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. नशामुक्त भारताच्या संकल्पपूर्तीसाठी जनजागृती, कुटुंब, समाज आणि विविध संस्थांच्या सामूहिक सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. युवकांची ऊर्जा आणि सकारात्मक विचार हे विकसित भारताचे बळ असल्याचे नमूद करत त्यांनी या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या आशयाचे पत्र ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियान कार्यक्रमादरम्यान वाचून दाखविण्यात आले.

वरळी येथील एनएससीआय डोम येथे गुरुवारी सकाळी ११.३० वाजता ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नशामुक्त भारत’चा संकल्प केला आहे. तो पूर्ण करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करणे आवश्यक आहे. भारत हा युवकांचा देश असून, देशाला आतून कमकुवत करण्यासाठी ड्रग्सचा वापर केला जात आहे. त्यामुळे ड्रग्सच्या संपूर्ण इकोसिस्टिमविरोधात सर्वांनी सामूहिक लढा उभारण्याची गरज आहे. आपल्या परिसरात अमली पदार्थांची विक्री किंवा संबंधित बेकायदेशीर हालचाली आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि उपयुक्त माहिती देणाऱ्याला पुरस्कारही दिला जाईल.

नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियान सुरू करणे ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. भारताचे शत्रू तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याचे षड्यंत्र रचत आहेत. त्यामुळे देशासाठी या नशेच्या संकटाविरुद्ध युवकांनी जागरूक राहून एकत्रितपणे लढा उभारणे आवश्यक आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अमली पदार्थांविरोधातील कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेनुसार युवकांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तळागाळापर्यंत जनजागृती पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे मंगल प्रभात लोढा म्हणाले की, केवळ सरकार किंवा पोलीस यंत्रणेवर सर्व जबाबदारी सोपवून चालणार नाही. समाजातील प्रत्येक नागरिक, पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्थांनी या अभियानात आपले योगदान देणे आवश्यक आहे. ‘ड्रग्स फ्री मुंबई’ हे केवळ सरकारी अभियान नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. या अभियानाबाबत सर्व समाजघटकांनी सक्रिय सहभाग घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी ती सकारात्मकरीत्या मान्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

देशविघातक शक्तींचा प्रयत्न असेच चालू राहतील आणि युवांना ड्रग्सच्या आहारी नेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे पालकांची जागरूकता आणि मुलांशी सातत्यपूर्ण संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘ड्रग्स फ्री मुंबई’ हे एक दिवसाचे अभियान नसून मुंबई पूर्णपणे अमली पदार्थमुक्त होईपर्यंत हा जनआंदोलनाचा प्रवास सुरू राहणार आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यांनी योग्य मार्ग निवडावा, योग्य कौशल्य आत्मसात करावे आणि स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी उज्वल भविष्य घडवावे हीच आमची इच्छा आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आम्ही अभ्यासासह तरुणांना विविध प्रकारचे कौशल्ये सुद्धा देत आहोत. राज्यभर हजारो कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. हीच कौशल्ये विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवतील. रोजगारक्षम युवांना उद्योजक बनवण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न आहे त्यासाठीच १५ ऑगस्टपासून ‘सीएम महाफंड’ योजना सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात एक लाख विद्यार्थी-विद्यार्थिनींना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट आहे, असेही मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना, “ड्रग्समुक्त मुंबईचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि समाजहितासाठी एकत्रितपणे पुढे यावे,” असे सांगितले.

राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती जनजागृतीसाठी समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्यांच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ट्रेनिंग मॅन्युअलचे यावेळी अनावरण करण्यात आले.

या अभियानांतर्गत वर्षभर विविध स्तरांवर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने मुंबईतील शाळा, महाविद्यालये, समुपदेशक, पालक आणि विविध सामाजिक संस्थांना एकत्र आणून अमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ‘अमली पदार्थांना नकार द्या, जीवनाला होकार द्या’ हा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे आणि युवकांना निरोगी, जबाबदार जीवनशैलीकडे प्रेरित करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

जेन-झी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांसोबत

आम्ही कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही आणि नशेपासून कायम दूर राहू, अशी शपथ झेन-जीनी घेतली. तसेच, नशामुक्त मुंबई आणि नशामुक्त भारत घडविण्यासाठी आम्ही शासन व पोलीस यंत्रणेला सर्वोतोपरी सहकार्य करू, असा विश्वास त्यांनी कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्यक्त केला. माननीय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत या कार्यक्रमात हजर असलेल्या १० हजार जेन झी युवांनी ड्रग्स सेवनाच्या विरोधात शपथ घेतली तसेच ऑनलाईन माध्यमातून ५ लाख पेक्षा जास्त विद्यार्थांनी शपथ घेतली.
……………………………………………………………..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button