
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी; खवळलेल्या समुद्रामुळे ग्रामपंचायतीचा निर्णय
गणपतीपुळे येथे सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे समुद्र अत्यंत खवळलेला असून किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गणपतीपुळे ग्रामपंचायतीने गुरुवारपासून समुद्रकिनाऱ्यावर उतरण्यास बंदी लागू केली आहे.
ग्रामपंचायतीने संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर मोठी दोरी बांधून पर्यटकांना समुद्राच्या दिशेने जाण्यास प्रतिबंध केला आहे. या निर्णयाची माहिती ग्रामपंचायतीच्या प्रशासक कल्पना पकये यांनी दिली.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, समुद्राची धोकादायक परिस्थिती लक्षात घेता पर्यटकांनी कोणत्याही परिस्थितीत समुद्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नियमांचे पालन करून स्वतःची सुरक्षितता जपावी, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




