
चांदेराईमध्ये कांबळे कुटुंबियांच्या घरावर झाड कोसळल्याने मोठे नुकसान
रत्नागिरी तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील चांदेराई बौद्धवाडी येथे राहत्या घरावर झाड कोसळण्याची घटना रविवारी रात्री घडली. राहुल विठू कांबळे (रा. चांदेराई बौद्धवाडी) यांचे हे घर असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे कांबळे यांच्या घराशेजारी असलेले मोठे झाड उन्मळून घरावर पडले. सुदैवाने त्यावेळी घरातील माणसे शेजारच्या घरात झोपायला गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे धोकादायक झाड तोडावे यासाठी वारंवार प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार घडला आहे. घरावर झाड पडल्याने घराचे पत्रे तुटून मोठे नुकसान झाले आहे. कांबळे यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचा आता निवासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे नुकसानग्रस्त राहुल कांबळे यांना आर्थिक मदत मिळावी अशी त्यांनी मागणी केली असून उद्या रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत अतिवृष्टीच्या पाहणीसाठी रत्नागिरीत येत असल्याने त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी कांबळे कुटुंबियांने केली आहे.




