
चिपळूणकरांसाठी गूड न्यूज ; १ जुलैपासून पोस्टाचा नवीन ‘चिपळूण विभाग’५ तालुक्यांतील नागरिकांना मोठा दिलासा
रत्नागिरी, दि. २९ ): रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्टल ग्राहकांसाठी आणि प्रशासकीय कामांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. डाक निदेशालय, नवी दिल्ली यांच्या मंजुरीनुसार, पोस्टाचा स्वतंत्र ‘चिपळूण विभाग’ बुधवार १ जुलै २०२६ पासून नव्याने कार्यरत होत आहे. या नवीन चिपळूण विभागाचा शुभारंभ १ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली आहे.
’या’ ५ तालुक्यांचा समावेश
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी चिपळूण, दापोली, खेड, गुहागर आणि मंडणगड या ५ उत्तर रत्नागिरीतील तालुक्यांमधील सर्व डाकघरे (Post Offices) आता नव्याने निर्माण होणाऱ्या चिपळूण विभागाला जोडण्यात येणार आहेत.
सध्याच्या रत्नागिरी डाक विभागाचा विस्तार राजापूरपासून थेट वेशवीपर्यंत अत्यंत दुर्गम भागांपर्यंत पसरलेला आहे. या अवाढव्य विस्तारामुळे प्रशासकीय कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
ग्राहकांना विभागीय स्तरावरील (Divisional Level) कामांसाठी थेट रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात यावे लागत असे. आता चिपळूण विभाग स्वतंत्र झाल्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत.




