
शीळ धरणातील पाणी गढूळ
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणात गाळयुक्त पाण्याची मोठ्याप्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रात गाळमिश्रित पाणी येत असून, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळूनच वापरावे, तसेच तुरटीचा वापर करावा, असे आवाहन रत्नागिरी नगरपरिषदेने केले आहे.
मान्सूनच्या जोरदार पावसामुळे शीळ धरणातील पाणीसाठ्यात आणि आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून वाहून येणार्या गाळामुळे जलशुद्धीकरण प्रक्रियेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेची दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी फिल्टर बेडची सातत्याने स्वच्छता (वॉशिंग) केली जात आहे. तसेच आवश्यक प्रमाणात क्लोरिनेशन करून नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.
तरीही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळूनच वापरावे आणि आवश्यक असल्यास तुरटीचा वापर करून पाणी स्वच्छ करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.www.konkantoday.com




