
राज्य शासनाच्या नव्या ’जीपीआर’ प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे दाखले रखडले, हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश संकटात
दहावी आणि बारावीच्या परीक्षा निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला वेग आला असताना राज्य शासनाच्या नव्या ’जीपीआर’ प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी आणि पालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. प्रवेशासाठी आवश्यक असलेली जात प्रमाणपत्रे, नॉन-क्रि मिलेअर, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रे वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी ’आपले सरकार’ आणि सेतू सुविधा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, शासनाने नुकतीच सुरू केलेली ’जीपीआर’ प्रणाली प्रत्यक्षात अनेक तांत्रिक अडचणींनी ग्रासलेली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया संथ झाली असून, अनेक अर्ज अपूर्ण अवस्थेतच अडकून पडले आहेत. या नव्या प्रणालीमध्ये नागरिकांच्या लॉगिनमधून अनेक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध असली, तरी सेतू केंद्रचालकांच्या लॉगिनमध्ये केवळ एकच कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिसत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. परिणामी विविध प्रमाणपत्रांसाठी आवश्यक असलेली अनेक कागदपत्रे एकाच अर्जासोबत जोडणे अशक्य होत आहे. त्यामुळे अर्ज पूर्णपणे सादर करता येत नसल्याची तक्रार केंद्रचालकांकडून केली जात आहे.
www.konkantoday.com




