
राजापूर तालुक्यात वादळी पावसाने पपईची ११ एकर बाग काही क्षणातच भुईसपाट, ३५ लाखांचे नुकसान
शनिवारी पडलेल्या अवकाळी वादळी पावसाने तालुक्यातील झापडे येथील शेतकरी समीर हाजू यांच्या तब्बल ११ एकर पपई बागेचा काही क्षणात अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये त्यांचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. झापडे परिसरात असलेल्या समीर हाजू यांच्या पपई बागेला जोरदार वारा आणि मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला. हाजू यांची संपूर्ण बाग भुईसपाट झाली.
हाजू यांनी मोठ्या मेहनतीने आणि लाखो रुपये खर्च करून उभारलेली पपई बाग अवघ्या काही तासात जमीनदोस्त झाली. विशेष म्हणजे, बागेतील पपईचे पीक काढणीच्या टप्प्यावर आले होते. त्यामुळे उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असतानाच अवकाळी पावसाने शेतकरी हाजू यांच्या आशांवर पाणी फेरले आहे.
दरम्यान, वादळी वार्यामुळे पपईची झाडे मुळासकट उन्मळून पडली असून अनेक झाडांवरील फळे खराब झाली आहेत. बागेतील सिंचन व्यवस्था आणि इतर साहित्याचेही नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकरी समीर हाजू मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
www.konkantoday.com




