रत्नागिरी शहरातील राजिवडा येथे घरावर कोसळला महाकाय आम्रवृक्ष; सुदैवाने जीवितहानी टळली


​रत्नागिरी शहरातील राजिवडा येथील प्रसिद्ध विश्वेश्वर मंदिराजवळ राहणारे राकेश पाटील यांच्या घरावर आज एक भले मोठे आंब्याचे झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
​​मिळालेल्या माहितीनुसार, विश्वेश्वर मंदिर परिसरात असलेल्या राकेश पाटील यांच्या घराजवळचे एक जुने आणि महाकाय आंब्याचे झाड अचानक उन्मळून थेट घराच्या छतावर कोसळले. झाड पडताना झालेल्या मोठ्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. झाड पडल्यामुळे घराच्या छताचे आणि भिंतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
​घटनेची माहिती मिळताच नगरसेवक सुहेल मुकादम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत शिवखोल येथील अनेक सतर्क नागरिकांनी देखील मदतीसाठी घटनास्थळी गर्दी केली. आपत्तीच्या काळात राजिवडा आणि शिवखोलमधील नागरिकांनी दाखवलेल्या या एकीचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
​युद्धपातळीवर मदतकार्य सुरू
​घराचे नुकसान झालेले असतानाच, अधिक धोका टाळण्यासाठी नगरसेवक सुहेल मुकादम आणि स्थानिक तरुणांनी तातडीने झाड कापण्याचे काम हाती घेतले.

​ या दुर्घटनेत पाटील यांच्या घराचे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून त्यांना योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
​”झाड पडल्याची बातमी समजताच आम्ही तिथे पोहोचलो. सुदैवाने घरात असलेली माणसे सुरक्षित आहेत, हे महत्त्वाचे. सध्या झाड हटवण्याचे काम सुरू असून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे,” अशी माहिती माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी दिली.
​भरवस्तीत ही घटना घडल्यामुळे काही काळ या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button