
कलिंगड नाही तर., 11 दिवसांनी पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर!
मुंबई शहरातील पायधुनी परिसरात 26 एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जाणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मृत्यूच्या रात्री डोकाडिया कुटुंबातील अब्दुल्ला डोकाडिया (वय वर्ष 44) त्यांची पत्नी नसरीन (वय वर्ष 35), दोन मुली आयेशा (वय वर्ष 16) आणि झैनब (वय वर्ष 13) यांनी बिरयानी आणि कलिंगड खाल्ले होते.
त्यामुळे या दोन पदार्थातून विषबाधा होऊनच या चौघांचा मृत्यू झाला असावा, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे कलिंगड किंवा बिरयानी खाल्ल्याने कसा काय कोणाचा मृत्यू होऊ शकतो? याबाबत अनेक डॉक्टरांनी, आरोग्य तज्ज्ञांनी आपले मत नोंदवले होते. मात्र, दोन ते तीन दिवसांपूर्वी या घटनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर आज गुरुवारी (ता. 7 मे) घटनेच्या 11 दिवसांनंतर डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे. डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू हा कलिंगड किंवा बिरयानी खाऊन झाला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू हा उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. चौघांच्याही शरीरात सापडलं उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले आहेत. प्रामुख्याने झिंक फॉस्फाईटचा वापर हा उंदीर मारण्यासाठी केला जातो. मात्र, तब्बल 11 दिवसांनी या घटनेमागचे खरे कारण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कलिना येथील एफएसएल लॅबमधील तज्ज्ञांनी अनेक चाचण्या केल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट कसं गेलं याचा शोध घेतला जात आहे. या चौघांची आत्महत्या आहे की त्यांना कोणी विषारी औषध देऊन मारले? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. मात्र, या माहितीनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच दुसरीकडे मात्र, डोकाडिया कुटुंबियांच्या नातेवाईकांनी कोणत्याही कटाची शक्यता फेटाळून लावली आहे.




