
सर्वात मोठी बातमी ! भाजप जिंकूनही पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करू शकणार नाही?ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार
बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. अशातच आज ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आले आहे, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.त्यामुळे आता बंगालमध्ये संवैधानिक संकटासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पत्रकार परिषदेत राजीनाम्याच्या प्रश्नावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. नैतिकदृष्ट्या आमचा विजय झाला आहे. मी राजभवनात जाऊन राजीनामा देणार नाही. आता पुढील रणनीतीबाबत पक्षाच्या सदस्यांसोबत चर्चा केली जाईल. मी आता भाजपाच्या अत्याचारांना अधिक सहन करणार नाही. मी रस्त्यावर उतरून लढा देईन. पुढे बोलताना त्यांनी आमचा सामना भाजपाशी नव्हता, तर निवडणूक आयोगाशी होता आणि आयोगाने भाजपासाठी काम केले असा गंभीर आरोप केला आहे.
राज्यपालांसमोर काय पर्याय?
आता ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेमुळे राज्यात संवैधानिक पेच निर्माण होऊ शकतो. मात्र, सरकार स्थापनेवर त्याचा थेट परिणाम होणार नाही. वरिष्ठ वकील शेखर नाफडे यांनी सांगितले की, जर ममता यांनी राजीनामा देण्यास नकार दिला, तर संविधानानुसार राज्यपाल त्यांचे सरकार बरखास्त करू शकतात, कारण निवडणूक आयोगाने आवश्यक अधिसूचना आणि जनादेश जारी केला आहे. निवडणूक निकालांना आव्हान देण्याचा ममता अधिकार कोणीही काढून घेऊ शकत नाही. मात्र, न्यायालयाकडून आदेश येईपर्यंत त्यांना निवडणूक आयोगाच्या जनादेशाचे पालन करावे लागेल.




