
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव ४ व ५ मे रोजी साजरा होणार
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९७६ साली सुरू झालेल्या या महाविद्यालयाने ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली टप्पा गाठला असून या महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव (२०२५-२६) सांगता सोहळा ४ व ५ मे रोजी मोठ्या उत्साहात खातू नाट्य मंदिर येथे साजरा होणार असल्याची माहिती संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांनी दिली.
संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत कार्यवाह सतीश शेवडे, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई, प्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर आदी उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, “४ मे रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ होणार असून गेल्या ५० वर्षांतील महाविद्यालयाच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारा माहितीपट यावेळी सादर केला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद नाईक, कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत व पुणे येथील चितळे उद्योग समूह, पुणे चे संचालक श्रीकृष्ण चितळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता भोजनानंतर २ वाजता माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी ३.३० वाजता माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा, तर सायंकाळी ५ वाजता माजी विद्यार्थ्यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल.”
५ मे रोजी दुपारी ३ वाजता माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम (सादरकर्ते BPA चे विद्यार्थी) होणार आहे. सायंकाळी ५ वाजता समारोप समारंभ होणार आहे. याचवेळी सुवर्ण महोत्सवानिमित्त एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मत्स्य व्यवसाय व बंदर विकास कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार किरण सामंत उपस्थित राहणार आहेत.
सर्व कार्यक्रमांना र. ए. सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, तसेच कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष ॲड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर यांच्यासह सर्व संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई व शालेय समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी व सुवर्ण महोत्सव समन्वयक प्रा. वैभव कानिटकर आणि समस्त अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय परिवार प्रयतशील आहेत.
माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, हितचिंतक व विद्याथ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन रवागिरी एज्युकेशन सोसायटीने केले आहे.




