
चिपळुणातील मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल अंतिम टप्प्यात
चिपळूण शहराची मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात मोडतोड होऊ नये याकरिता उड्डाणपुलाचा पर्याय निवडण्यात आला, मात्र मंजुरीनंतर प्रारंभी अनेक वर्षे रखडलेल्या बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालय दरम्यानचा उड्डाणपूल आता अंतिम टप्यात पोहचला आहे. तब्बल ९६ पिलरवर उभा राहात असलेला कोकणातील सर्वाधिक लांबीचा हा उड्डाणपूल चिपळूणचा चेहरामोहरा बदलणार आहे. तब्बल ३७० कामगारांच्या दिवसरात्र मेहनतीमुळे आतापर्यंत ८७ टक्के पुलाचे काम पूर्ण झाले असून मे अखेरपर्यंत उर्वरित काम पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे.
चिपळूण शहराच्या विकासात महत्त्वाची भर घालणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील चिपळूण टप्यात, उभारला जाणारा १ हजार ८३५ मीटर लांबीचा व २५ मीटर रुंदीचा भव्य उड्डाणपूल वेगाने आकार घेत आहे. पेढे-परशुराम त खेरशेत या ३४ किलोमीटरच्या टप्प्यातीलहा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. या उड्डाणपुलासाठी ९६ पिलर उभारण्यात आले असून एकूण ७२८ गर्डरपैकी आतापर्यंत ७१३ गर्डर बसवण्यात आले आहेत.
www.konkantoday.com




