
नागपूर ग्रामीण हादरले; स्फोटात १७ कामगारांच्या चिंधड्या, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. राऊळगावात आक्रोश!
नागपूर : जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळील ‘एवनीरा’ परिसरातल्या एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळायात १७ कामगारांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या. मृतांमध्ये १४ महिलांसह ३ पुरुष कामगारांचा समावेश आहे. यात आणखी १८ कामगार भीषण गंभीर जखमी झाले.
जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी मृतांच्या आकड्याला दुजोरा दिला. स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत अनेक कामगार गंभीररित्या भाजले आहेत. जखमींपैकी १८ जणांना ऑरेंजसिटी रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकजण ५० टक्क्यांच्या वर भाजले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे.
घटनेचा थरार
रविवारी सकाळी ७ ते ८:३० च्या सुमारास कंपनीच्या ‘१६-बी’ आणि ‘२०-बी’ नॉनल क्रिम्पलिंग युनिटमध्ये एकामागून एक शक्तिशाली स्फोट झाले. घटना घडली त्यावेळी युनिटमध्ये ३६ कामगार उपस्थित होते. स्फोटांची तीव्रता इतकी भयानक होती की, त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. कारखाना परिसरात धुराचे लोट पसरले आणि सर्वत्र रक्तामांसाचा सडा पडला होता. सकाळी दुपारी १२ पर्यंत ढिगाऱ्याखालून १७ कामगारांचे पूर्णपणे जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अशी आहेत मृतांची नावे
या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिलांची संख्या मोठी असून, अनेक जणी आपल्या कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्ती होत्या. मृतांमध्ये गणेश टोंगे, प्रेमदास बागडे, राजू कुळमते, शोभा तपासे, पायल गजभिये, संगीत पंचभाई, अनुसया पाटील, दुर्गा गायकवाड,ज्योत्स्ना शेंडे, मयुरी येसकर, सुनंदा चिंचखेडे, सविता गणेश काळमेघ, गायत्री शेंडे,मीना ऊके, ज्योत्सना शेंद्रे यांचा समावेश आहे.
१८ जखमींची प्रकृती चिंताजनक
या स्फोटात १८ कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शरीराचा मोठा भाग भाजला आहे. जखमींमध्ये प्रामुख्याने दुर्गा मनोज धोटे (३१), वैशाली गणेश सतई (४०), सुगंधा विनायक रक्षित (५५), उषा रेवतकर (४३),
काजल कोरती ( ३८) ,मनीषा धुर्वे (४२) , कविता ऊईके(४५) , ज्योती धुर्वे (२१) सुनीता ऊईके ( ३५), रंजना घागरे (३६ ), वैशाली धुर्वे (३०), सीमा धुर्वे (२७), रोशनी माटे (३२), रितु सलाम (२०), आम्रपाली काळसरपे (३५), दुर्गा सोतेरकर (४२),रोशनी दिपक मसराम( ३२),भारती शेंडे यांचा समावेश आहे.
मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश
स्फोट झाला त्या वेळी घटनेच्या ठिकाणी अनेक कामगार नुकतेच कामावर आले होते. एका पाळतील कामगार क्रिंपलिंग युनिटमध्ये काम करत असताना ही घटना घडली. या युनिटमध्ये जिलेटिनची कांडी स्फोटकांनी भरल्यानंतर त्याचे पॅकिंग केले जाते. तेच काम करत असताना स्फोटांच्या मालिकेला सुरुवात झाली. युनिटमध्ये काम करत असलेल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेण्याचा प्रयत्न केला.
बीडीएस, फॉरेन्सिक टीमचा ताबा
घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोध व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सोबतच झोन २ आणि ग्रामीण पोलिस दलातील दोन न्यायवैद्यक प्रयोगशाळांची टीम घटनास्थळी पोचली. टीममध्ये सहा अधिकारी आणि नमुने गोळा करण्यासाठी १२ जणांचा समावेश आहे.
पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी घटनास्थळी
माहिती मिळताच सकाळी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची पाहणी केली. विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय अधिकारी पीयूष चिवंडे आणि तहसीलदार आभा वाघमारे, कामगार आयुक्त किशोर दहिफळकर घटनास्थळी पोचले. काटोल, कळमेश्वर, कोंढाळी, वानाडोंगरी अग्निशक दलाचे प्रत्येकी दोन बंब आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या टीमनेही धाव घेतली.
सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, याच कंपनीत यापूर्वीही १६ फेब्रुवारी २०२४, २६ एप्रिल २०२४ आणि ९ सप्टेंबर २०२५ रोजी अपघात झाले होते. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे कंपनीच्या सुरक्षा मानकांवर आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला जात आहे.
राजकीय नेत्यांचीही धाव
स्फोट झाल्याची माहिती मिळताच अर्थराज्यमंत्री आशिष जैस्वाल, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुनीता गावंडे, आमदार चरणसिंग ठाकूर, माजी आमदार प्रकाश गजभिये, भाजपाचे ग्रामीण अध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी मृत आणि जखमी नातेवाईकांशी हितगूज साधत धीर दिला. घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी माजी गृहमंत्री देशमुख यांनी केली. तर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाखांची तातडीने मदत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य बारुद फॅक्टरी संघटना अध्यक्ष स्वप्निल वानखेडे यांनी केली. बनवणऱ्या डिटोनेटर कंपनीत रविवारी सकाळी भीषण साखळी स्फोट झाले.




