
करवाढीच्या प्रस्तावावरून नगरपालिकेत खडाजंगी
उबाठा’ गटाचा विरोध: उपनगराध्यक्षांनीही मांडली लोकभावना
आर्थिक डबघाईला आलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करून तूट भरून काढण्यासाठी कर लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामध्ये अग्निशमन कर, दिवाबत्ती कर तसेच स्वच्छता कर प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव होता. मात्र यामुळे विश्वासाने निवडून दिलेल्या रत्नागिरीकरांवर मोठा आर्थिक भार पडेल असे सांगत उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्यासह काही सदस्यांनी सभेत मांडले. तसेच ठाकरे शिवसेनेकडूनही याला विरोध नोंदवण्यात आला.
नगरपालिकेचा सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाला आणि २०२५-२६ च्या सुधारित अर्थसंकल्पला मंजुरी देण्यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभेचे आयोजन केले होते. यात कर वाढीवरून मतमतांतर दिसून आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांनी यातील अग्निशमन आणि दिवाबत्ती कर लागू करण्याला मान्यता द्यावी आणि स्वच्छता कराबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे मत मांडण्यात आले. यावर अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत अर्थसंकल्पला मंजुरी देत ही सभा स्थगित केली.




