
एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटेन..’, राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी राज ठाकरेंनी भेट घेतली.या भेटीचे कारण समोर आले नसल्याने नवी राजकीय खेळी असल्याचे बोलले जात होते. अशातच आता या भेटीबाबत स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
“आपल्याकडे पूर्वीसारखं निकोप राजकारण राहिलेलं नाही. कुणी कुणाला भेटलं की त्यातून युत्या आघाड्या असं राजकारण शोधायचं. आता तीन वर्षांनी निवडणुका आहेत. आता निवडणुका संपलेल्या आहेत. आज ते सत्तेत आहेत. आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील, चांगल्या गोष्टी करुन घ्यायच्या असतील तर भेटायला नको का? प्रत्येकवेळी त्यातून राजकारणचं शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही, उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन..” असं राज ठाकरे म्हणाले.आज मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत. ते आम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे. शहराची रोजची स्थिती बिकट अन् भीषण अवस्थेला पोहोचली आहे. रस्ते, फ्लायओव्हर बांधणं म्हणजे विकास नव्हे, ती फक्त सूज आहे. आज सर्वच शहरांमध्ये डेव्हलपमेंट सुरु आहे. अशा परिस्थितीत अनेकांकडे गाड्या आहेत, त्या रस्त्यावर उभ्या आहेत. रस्त्यांवर ट्रॅफिक होत आहे. शहरांमध्ये येणारी माणसं थांबत नाहीत. हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांना सांगितली होती, तीच एकनाथ शिंदेंना सांगितली. त्यांनी तात्काळ भुषण गगराणींना फोन केला,” असं राज ठाकरेंनी सांगितले.




