
रंगभूमीची दीपस्तंभ हरपली! मराठी रंगभूमीवरील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व विजया मेहता यांचे निधन!
मराठी रंगभूमीवरील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, एक शिस्तप्रिय गुरु आणि अभिनयाचा एक स्वतंत्र विचार मांडणाऱ्या विजया मेहता (बाई) यांचे निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजया मेहता यांची एक्झिट संपूर्ण कलाविश्वासाठी चटका लावून जाणारी असून रंगभूमीवरील एक मार्गदर्शक आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
विजयाबाई म्हणजे केवळ एक नाव नव्हते, तर ती एक संस्था होती. त्यांनी मराठी रंगभूमीवर अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे अनेक प्रयोग केले. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या प्रतिभेने रंगभूमी समृद्ध केली. अभिनयासोबतच ‘पार्टी’ सारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. विशेषतः नवीन पिढीतील कलाकारांना घडवताना त्यांनी दाखवलेला संयम आणि शिस्त ही वाखाणण्याजोगी होती. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्यासारख्या कलाकारांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. रावसाहेब, पेस्तनजी हे हिंदी चित्रपट , स्मृतिचित्रे ही मराठी टेलिफिल्म विजया बाईंनी दिग्दर्शित केली.
१९६० च्या दशकात त्यांनी विजय तेंडूलकर, अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत रंगायन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मराठी भाषेत सुरू केली. ‘झिम्मा’ या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास वाचायला मिळतो. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कलाकृती आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. विजयाबाईंचे जाणे हे मराठी संस्कृतीच्या दृष्टीने एक मोठे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने रसिक प्रेक्षकांचे डोळे नक्कीच पाणावले आहेत.




