भात लावणीतून विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव

रत्नागिरी, दि. १६ जुलै : शहरातील जी. जी. पी. एस. प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी काल पावस येथील श्री. विकास पावसकर यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या भात लावणी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्यक्ष शेतात उतरून विद्यार्थ्यांनी भाताची रोपे लावत शेतीचे महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव अनुभवली.
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना भात लागवडीची पद्धत, रोपांची योग्य अंतरावर लागवड, पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदाने श्रमदान करत शेतीविषयी आत्मीयता आणि निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ केले.
शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सहकार्याची भावना आणि कृषी संस्कृतीबद्दल आदर निर्माण झाला. अनुभवाधारित शिक्षणाचा उत्तम नमुना ठरलेल्या या उपक्रमाचे सर्वांनीच मनापासून कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत गुरुकुलच्या काही शिक्षकांनीही अत्यंत आवडीने प्रत्यक्ष सहभाग घेऊन भाताची लागवड केली.
संपूर्ण उपक्रम गुरुकुल विभाग प्रमुख श्री. वासुदेव परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जी.जी.पी.एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर व र. ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button