
’आर्यारवी एंटरटेनमेंट’ च्यावतीने मुंबईत पत्रकार, समाजसेवक व कलावंतांचा गौरव
’आर्यारवी एंटरटेनमेंट’ च्यावतीने रविवार दि. १२ जुलै रोजी मुंबईत पत्रकार, समाजसेवक आणि कलावंतांचा गौरव सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि पत्रकारिता क्षेत्रातील महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सोहोळा दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉलमध्ये सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.
या सोहोळ्यात ’स्वाभिमान लेखणी’, ’शब्दवेध गौरव’, ’अजेय लेखणी’, ’कलम-रत्न’, ’कलागौरव’, ’साहित्य-संस्कृती जीवनगौरव’, ’विवेक-दीप’, ’जनसेवा रक्षक’ तसेच निर्भीड पत्रकारिता पुरस्कारांसह विविध सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत. जगप्रसिद्ध बोलके बाहुलाकार व जादूगार श्रीधर कीर, प्रा. विसुभाऊ बापट, कवी व सांहित्यिक अरुण म्हात्रे, साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे, ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर, ऍड. सुनिल शिर्के आणि समाजसेवक कृष्णा काजरोळकर यांच्या हस्ते पुरस्कत्रांचे वितरण होणार आहे.
या सोहोळ्यात चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावचे सुपुत्र, गुहागर पंचायत समितीतील कैनिष्ठ लेखाधिकारी मिलिंद कदम यांना ’अजेय लेखणी’ या विशेष पुरस्काराने गौरविले जाणार आहे कदम शासकीय सेवा बजावित असतानाच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच वर्तमान पत्रात विविध विषयांवर परखड लिखाण करीत समाज जागृती देखील ते करीत आहेत. त्यांच्या लिखाण कौशल्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे.




