
पावसाचा दिलासा; पण औद्योगिक वसाहतींची पाणीटंचाई कायम, अद्यापही काही कारखान्यात उत्पादन बंद
यंदा पावसाने उशिरा हजेरी लाविल्याने कोकणातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका चिपळूण तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रालाही बसला असून लोटेपरशुराम, गाणे-खडपोली आणि खेर्डी औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यांचे उत्पादन पाण्याअभावी बंद ठेवावे लागले आहे.
पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने उद्योगांना आवश्यक असलेला प्रक्रिया व वापरासाठीचा पाणीपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक कंपन्यांनी उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला. औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांपैकी घरडा केमिकल्स, लक्ष्मी ऑरगॅनिकसह काही उद्योगांचे उत्पादन अद्यापही बंद आहे. उत्पादन बंद असल्याने त्याचा थेट परिणाम कंत्राटी कामगारांवर झाला आहे. अनेक कामगारांना कारखाने पूर्ववत सुरू होईपर्यंत रजेवर पाठविण्यात आले आहे. काही ठिकाणी कामगारांना एक दिवस आड कामावर बोलाविले जात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी अद्याप पावसाचा जोर अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. त्यामुळे जलस्रोत भरून औद्योगिक वसाहतींना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com




