
एवढ्याच्या अल्प निधीत पौष्टीक खिचडी द्यायची कशी? शिक्षकांसमोर पेच
केंद्र सरकारची प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पूर्वीचे मध्यान्ह भोजन) योजना ही विद्यार्थ्यांच्या आरोग्य, उपस्थिती व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात. मात्र सातत्याने वाढणार्या महागाईमुळे या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सध्या प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी दररोज फक्त ७ रुपये तर उच्च प्राथमिकसाठी ९.७० रुपये इतकेच अनुदान दिले जाते. या रकमेतून धान्य, डाळ, भाज्य, तेल, मसाले, गॅस आणि वाहतूक खर्च भागवणे अशक्य असल्याने शाळा व्यवस्थापन समित्या आणि शिक्षक त्रस्त झाले आहेत.
मानव संसाधन विकास मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज १०५ ग्रॅम धान्य, २० ग्रॅम डाळी, ५० ग्रॅम भाज्या आणि आवश्यक तेल, मसाले तर सहावी ते आठवीसाठी १५० ग्रॅम धान्य, ३० ग्रॅम डाळी आणि ७५ ग्रॅम भाज्या देणे बंधनकारक आहे. मात्र बाजारभाव आकाशाला भिडल्याने या निकषांचे पालन करणे शाळांसाठी अशक्य झाले आहे.www.konkantoday.com




