
औद्योगिक वसाहतीतील जल व वायू प्रदूषणामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचा ग्रामस्थांचा आरोप, दोन महिन्यात तिघांचा कॅन्सरने मृत्यू.
खेड तालुक्यातील घाणेखुंट येथील औद्योगिक वसाहतीनजीक असलेल्या गवळीवाडीत गेल्या दोन महिन्यात कॅन्सरच्या आजाराने तिघांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. औद्योगिक वसाहतीतील जल आणि वायू प्रदूषणामुळे तीन ग्रामस्थांना प्राण गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत असलेल्या रासायनिक कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कारखाना निरीक्षक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर संबंधित यंत्रणांचा वचक नसल्यान रासायनिक कारखानदारांची मनमानी सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
पंचक्रोशीत कॅन्सर आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या २ महिन्यात घाणेखुंट- गवळीवाडीतील दर्शना दत्ताराम खताते (५०), सतीश उर्फ बंड्या भिकू खताते (३५), संतोष सोनू महाडिक (५४) हे तीन रुग्ण कॅन्सरने दगावले. तीनही रुग्णांच्या कुटुंबियांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांवर लाखो रुपयांचा खर्च करूनही कुटुंबियांना त्यांचा जीव वाचवता न आल्याने तीनही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. कफ, दमा, त्वचारोग आदी आजारही वेगाने फैलावत असल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत. ही बाब संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने न घेतल्यास प्रदूषणकारी कारखान्यांवर धडक देत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. www.konkantoday.com