आजची सून -उद्याची सासू.

स्त्री ही परमेश्‍वराच्या निर्माण केलेल्या असंख्य कलाकृतींपैकी एक अलौकिक कलाकृती! असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कारण आदिशक्ती, आदिमाया, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा इ. रूपांत आपण सारे तिची पूजाअर्चा, आराधना करीत असतो. कौटुंबिक पातळीवर हीच स्त्री पत्नी, माता, मुलगी, बहिण, मावशी, काकी, आत्या, वहिनी, मैत्रिणी सून, सासू अशा अनेक नात्यांनी कुटुंबात, समाजात, अनेकांशी जोडलेली असते बरं. प्रत्येक नात्याचं कर्तव्य, जबाबदारी ही वेगवेगळी, मात्र या प्रत्येक नात्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न ही स्त्री करीत असते.

मुलीचा जन्म हा माझ्या मते सर्वश्रेष्ठ ! कारण स्त्री नसेल तर सृष्टीचं सृजनशीलतेचं चक्र संपुष्टात येईल. ‘मातृत्व’ हा स्त्रीचा खरा दागिना! त्यामुळे स्त्रीच्या आयुष्यात विवाहाला अनन्यसाधारण महत्व आहे. लहानपणी आई-वडिल, भाऊ-बहिण यांच्या छत्रछायेत वाढलेली तरूणी लग्नानंतर सासरी पती, सासू-सासरे, दीर, नणंद यांच्या प्रेमळ, संरक्षित वातावरणात रूळते, अगदी तन-मन-धन अर्पून! खरंच, लग्नापूर्वीची सर्व नाती एका बाजूला आणि पत्नी व सून ही विवाहानंतरची नाती निभावताना स्त्रीला आपलं जीवन सार्थकी लागल्याचा आनंद होत असतो. तिचं अवघं आयुष्य नव्या सुख-स्वप्नांनी बहरून येत. जसं माहेरी आई-मुलीचं नातं नाजूक, प्रेमळ धाग्यांनी विणलेलं असतं तसंच सासरी सासू-सूनेचं नातं विणणं अपेक्षित असतं. परंतु फार थोड्यांच्या नशिबी हे सुख येतं असं नाईलाजाने म्हणावं लागतं. कारण प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलीला चांगली सासू मिळावी परंतु ती आपल्या सुनेला मुलीप्रमाणे वागवते का? असेल तर तिचं वर्तन पाहून तिची मुलगी उद्या सून म्हणून दुसर्‍या घरी गेल्यावर तीसुद्धा तिच्या सासूकडे त्याच दूषित नजरेने पाहते. त्यामुळे तिची सासू कितीही चांगल्या आचार-विचारांची असली तरी सुनेला ते समजू शकणार नाही. आणि ती नेहमी आपल्या सासूचा दुःस्वासच करणार.

सासूची प्रत्येक गोष्ट तिला खटकणार. तिला जेवढा जास्तीत जास्त त्रास देता येईल त्यासाठी ती सतत रोज नवनवीन कुटील कारस्थानं रचत राहणार. आपल्या नवर्‍याचे कान भरणार. यामुळे ती स्वतःचा संसार तर उध्वस्त करेलच परंतु सासरचं संपूर्ण कुटुंबही दुःखी करते आणि विशेष म्हणजे यातच ती धन्यता मानते.परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिच्या हे लक्षात येत नाही की आपणही उद्या सासू होणार आहोत, मग त्यावेळी आपली सून जर आपल्याशी असं वागली तर?

वाचकहो, ‘आजची सून’ ही ‘उद्याची सासू’ होणार असते, हे विसरून चालणार नाही. ‘पेरावे तसे उगवते’ असं म्हणतात त्या प्रमाणे उद्या तुमची सूनही तुमच्याशी तसंच वागणार. गेली ३०-३५ वर्षे कोर्टात आणि माझ्या स्वतःच्या संस्थेत समुपदेशक म्हणून काम करत असताना अशी हजारो प्रकरणं मी हाताळली आहेत आणि आजूबाजूला हेही पाहिलंय की जी सून आपल्या सासूशी ज्या वाईट पद्धतीने वागलेली असते तिची सूनसुद्धा आता तिच्याशी त्याचप्रकारे वागत असते. आता तक्रार कोणाकडे करणार? आजच्या बहुसंख्य मुलींना पती हवा असतो. मात्र त्याच्या कुटुंबातील इतर माणसे नको असतात. त्यामुळे लग्नानंतर त्या आपले विभक्त कुटुंब थाटतात. पण स्वतः सासू झाल्यावर मात्र त्यांच्या सुनेने एकत्र कुटुंबात राहावं असा आग्रह धरतात. तसंच स्वतः सुनेला होणारं मूल मुलगा किंवा मुलगी चालते. पण सासू झाल्यानंतर मात्र वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असतो. त्यावेळी आपण स्वतः एक मुलगी म्हणून जन्म घेतलाय याचा विसर पडतो आणि स्त्रीभ्रूणहत्येचं पातक आजही केलं जातयं. ही वृत्ती फार घातक आहे.परंतु प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. काहींच्या वाट्याला हे दुःख येतं. मी काही कुटुंब अशीही पाहिलीत की जिथे ‘सासू -सुना’ अगदी गुण्यागोविंदाने नांदताहेत.

सासू-सुनेच्या प्रगतीसाठी, तिच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी, नोकरीसाठी अगदी आईच्या मायेने तिला साथ देत असते. आणि तिच्या सुनाही तिला अगदी आपल्या आईप्रमाणे प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने जपत असतात.जगात कोणतीही व्यक्ती ही परिपूर्ण नाही. प्रत्येकात बरेवाईट गुणदोष हे असतातच. परंतु प्रत्येकाने दुसर्‍याचे चांगले गुण ओळखून त्याला प्रोत्साहन देण्याचे आणि काही दोष असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करून त्या व्यक्तीला आपल्या संयमी, चांगुलपणा, प्रेम, विश्‍वास या जोरावर ते दोष सुधारण्यास मदत केल्यास कोणतंही नातं फुलण्यास मदत होईल, यावर माझा ठाम विश्‍वास आहे.

हीच गोष्ट सासू-सुनांनाही लागू पडते. एखाद्या सासूने तिचा संसार जर काबाडकष्ट करून जिद्दीने, प्रामाणिकपणे उभा केला असेल. आपल्या मुलांना ‘माणूस’ म्हणून घडवलं असेल तर तिच्या वागण्यात रोखठोकपणा, स्वाभिमान हा दिसणारच! याचा अर्थ असा होत नाही की ती अहंकारी, दुष्ट आहे तिचा आजवरचा प्रवास जर येणार्‍या सुनेने समजून घेतला तर ती नक्कीच आपल्या सासूला समजून घेवू शकेल. शिवाय सासू-सुनांमध्ये एका पिढीचं अंतर असतं हेही विसरून चालणार नाही. वयोमानाप्रमाणे वागण्या-बोलण्यात काही फरक पडू शकतो. जी सून हे समजून घेवू शकते मला वाटतं ती नक्कीच ‘उद्याची यशस्वी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी सासू’ होवू शकते. याचबरोबर ‘सासू’ म्हणून आपलं नातं जोपासताना स्त्रीने आपल्या तरूण वयातील सुनेच्या आशा-आकांक्षा, इच्छा, महत्वाकांक्षा यांचाही विचार केला पाहिजे.

थोडक्यात, प्रत्येक नातं जपताना त्या त्या नात्याची आपण भूषवित असलेली ‘खुर्ची’ प्रत्येकाला योग्य वेळी सोडता आली पाहिजे. एकदा का या खुर्चीचा अहंकार, मोह आपण योग्य वेळी सोडू शकलो तर प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धीचं नंदनवन फुलेल आणि प्रत्येक ‘आजची लाडकी सून’ आपल्या सासूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ‘उद्याची समंजस सासू’ म्हणून स्वतःचा आदर्श निर्माण करू शकेल यात शंकाच नाही.

– श्रद्धा सुभाष कळंबटे ‘चिंतामणी’, आनंदनगर, थिबापॅलेस रोड, ता. जि. रत्नागिरी वय-६५ वर्षे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button