दापोली हर्णै बंदरातील वातावरण शांत झाल्याने नौका पुन्हा समुद्रात
गेले दोन दिवस मुसळधार पाऊस आणि वादळी वातावरण यामुळे हर्णै बंदरातील मासेमारीला ब्रेक लागला होता. मात्र वातावरण शांत होताच मच्छिमारांनी आपल्या नौका समुद्रात लोटल्या आहेत. दापोली तालुक्यातील हर्णै बंदरातील मासेमारीला यंदा उशिराच सुरूवात झाली. त्यानंतर गणपतीसाठी १० दिवस नौका बंद होत्या. दरम्यान २० सप्टेंबरपासून मासेबारीला जोर आला होता. त्यामुळे हर्णै बंदरातील उलाढालीला वेग आल्याचे चित्र पहायला मिळत होते. सध्या हर्णै बंदरात कोळंबी, सौंदळा, बांगडा, पापलेट, म्हाकुळ, लेपा आदी मासळी उपलब्ध होती. त्यामुळे मासळी खरेदीसाठी गर्दी वाढताना दिसत होती. मात्र २ दिवसांपूर्वी अचानक वातावरणात बदल झाला. मुसळधार पाऊस आणि वादळी वातावरण यामुळे समुद्र खवळलेला दिसत होता. त्यामुळे मच्छिमारांनी आपल्या नौका माघारी आणल्या होत्या. मात्र समुद्री वातावरण शांत झाल्याचा अंदाज घेवून नौकांनी बर्फ डिझेल रेशन भरायला सुरूवात केली. त्यापैकी बहुतांश नौकांनी शनिवार-रविवारपासून मासेमारीसाठी कूच केली आहे. त्यामुळे हर्णै बंदरातील लगबग वाढलेली दिसत आहे.www.konkantoday.com