गोव्यामध्ये दलालीचा व्यवसाय करणार्‍या रत्नागिरीच्या मच्छीविक्रेत्याला लंडनमधून खंडणीसाठी फोन

गोव्यामध्ये दलालीचा व्यवसाय करणार्‍या रत्नागिरीच्या मच्छीविक्रेत्याला लंडनमधून खंडणीसाठी सातत्याने फोन येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिना ५० हजार रुपये दे अन्यथा तुला ठार मारू तसेच मच्छीचे ट्रक जाळून टाकू अशी धमकी देण्यात आली. यामुळे गोव्यात घाऊक मच्छीविक्री करणार्‍या दलालांचे धाबे दणाणले आहे. याप्रक़रणी गोवा पोलिसांकडून धमकी देणार्‍या तिघा अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सतीब रामचंद्रन (रा. रत्नागिरी) असे मच्छीविक्रेत्या दलालाचे नाव आहे. रत्नागिरी येथील रहिवासी असलेल्या सतीब रामचंद्रन यांचे उत्तर गोव्यातील बेती येथील मालीम जेटी येथे कार्यालय आहे. येथील मच्छीविक्रेत्यांकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणीची मागणी केली जात असल्याची तक्रार गोवा पोलिसांत दाखल केली आहे.
राज्यात चार प्रमुख मासेमारी बंदर असून तेथे अनेक ट्रॉलर मालक या व्यवसायात गुंतलेले आहेत. गोवा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातूनही मासळी आयात करतो. राज्यात हजारो मासे विकणारे दलाल आहेत, जे घाऊक/ट्रॉलर यांच्याकडून मासळी खरेदी करतात आणि विक्री करतात. या व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने या मच्छीविक्रेत्या दलालांना लक्ष्य केले जात असल्याचे बोलले जात आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button