मुंबई-गोवा चौपदरीकरण : परशुराम घाट ते कापसाळ पर्यंतची अतिक्रमणे सोमवारी हटवणार
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला सध्या गती देण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे चिपळुणातील सुमारे 35 कि.मी. अंतराच्या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम धीम्यागतीने सुरू आहे. कामाची गती वाढविण्यासाठी सोमवारी (दि.14) रोजी परशुराम घाट ते कापसाळ दरम्यानच्या महामार्गावरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. परशुराम घाट ते आरवली दरम्यान अनेक कारणांनी वाद उद्भवून चौपदरीकरणाचे काम वारंवार ठप्प होत आहे.काम करणार्या ठेकेदार कंपन्या देखील बदलत आहेत. आता मात्र मे अखेर संपूर्ण चौपदरीकरणाचे काम पूर्ण व्हावे, या उद्देशाने परशुराम घाट ते कापसाळ दरम्यानचा सुमारे दहा कि. मी. मार्गावरील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे हटविण्याचे काम सोमवारपासून संबंधित ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून प्रशासनाच्या सहकार्याने केले जाणार आहे. महामार्गालगत संपादीत केलेल्या जागेवर असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत महसूल विभाग, पोलिस, राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.