मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांची पुन्हा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

रत्नागिरी : मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांची पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर चिपळूण तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांच्या उपस्थितीत या दोघांनाही नियुक्तीपत्र दिली. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील मनसैनिक उपस्थित होते. संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे सुपुत्र जितेंद्र चव्हाण यांच्या जागी अविनाश सौंदळकर यांची दोन महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष पदावरून बदलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. व नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर तत्काळ जितेंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र् नवनिर्माण नाविक सेनेच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पक्षाला उभारी देण्यासाठी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता दक्षिण, मध्य व उत्तर असे तीन भाग करून काम करणे सोपे व्हावे याकरिता वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय घेतला गेल्याचे समजते. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी अविनाश सौंदळकर यांच्याकडे लांजा, राजापूर व रत्नागिरी या तीन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता जितेंद्र चव्हाण यांच्याकडे संगमेश्वर, चिपळूण व गुहागर या तीन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर लवकरच खेड, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यांसाठी नवीन जिल्हाध्यक्षाची नियुक्ती केली जाईल, असे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button