रत्नागिरी तालुक्यातील साखरतर ग्रामपंचायतीवर ग्रामस्थ धडकले

रत्नागिरी ः जागतिक बँक अर्थसहाय्यीत जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत कासारवेली पाणी पुरवठा योजनेंतर्गत साखरतवासीयांसाठी मंजूर योजनेचा काम अजुनही अपूर्ण आहे. या योजनेवरुन म्हामुरवाडीला अनधिकृत जोडणी देण्यात आली आहे. परिणामी साखरतरवासीयांना पुरेसा पाणी पुरवठा होणार नाही, याचा जाब विचारण्यासाठी साखरतर ग्रामस्थांनी शनिवारी (ता. ७) ग्रामपंचायतीवर धडक दिली. मागण्यांची पुर्तता झाली नाही, तर १ जुननंतर ग्रामस्थ आंदोलन करणार असून भविष्यात येणार्‍या निवडणुकीत मतदान करणार नाहीत असा इशारा दिला आहे.
जलस्वराज्यमधून साडेतीन कोटी रुपये कासारवेली ग्रुप ग्रामपंचायतीमधील साखरतर व म्हामुरवाडी या दोन महसुली गावांचा समोवश आहे. साखरतर गावासाठी शिळ येथील धरणाच्या खालील बाजूस नाल्याच्या उजव्या तीरावर पुरवठा विहीर बांधण्यात आली आहे. तेथून तीन हजार लोकवस्तीला पाणी पुरवठा करण्यासाठी योजना राबविण्यात आली आहे. कासारवेली ग्रामपंचायतीमधील तीसरे गाव म्हामूरवाडी असून महसुली गावासाठी यापूर्वीच अस्तित्वातील केळ्ये-आंबेकोंड येथील विहिरीवरून योजना करण्यात आली आहे. गतवर्षी ऐन कोरोना कालावधीत म्हामूरवाडीला पाणी टंचाई भासू लागली. परिस्थिती लक्षात घेऊन नव्या योजनेच्या विहिरीवरून साखरतरकडे जाणार्‍या वाहिनीला व्हॉल्व बसवण्यात आला. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पाणी दिले गेले. सद्यःस्थितीत हा व्हॉल्व काढण्यास म्हामुरवाडीतील ग्रामस्थ विरोध करत आहेत. तर साखरतर ग्रामस्थांनी तो व्हॉल्व काढण्यासाठी आग्रही भुमिका घेतली आहे. जोडणी अनधिकृत असून ती काढणे आवश्यक आहे. तसेच साखरतरपर्यंत योजनेचे झालेले काम अजुनही अपुर्ण आहे. ग्रामस्थांकडून मीटर बसवण्यासाठी चौदाशे रुपये घेण्यात आले आहेत. अजुनही ठेकेदाराकडून मीटर बसविण्यात आलेले नाहीत. ठेकेदारही गायब असून त्याच्याकडून काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. या गोंधळामध्ये योजनेचे काम अपूर्ण राहील आहे. ते वेळेत पूर्ण करुन गावातील साडेसहाशे कुटूंबाना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहीजे. अन्यथा योजनेचा काहीच उपयोग होणार नाही. यासाठी शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी पदाधिकारी, सदस्य उपस्थित नव्हते. कालांतराने उपसरपंच आले आणि संबंधित मागण्यांचा विचार केला जाईल असे सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी येत्या १ जुनपर्यंतचा मुदत दिली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करणार असून मतदान करणार नाहीत असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. आंदोलनाचे नेतृत्व आतिफ साखरकर, अकिल साखरकर, माजी सरपंच निसार राजापूरकर, निजाम मुल्ला, इम्तियाज पटेल, रफिक साखरकर, जाईद मुल्ला, मन्सूर साखकर यांच्यासह सुमारे तीनशेहून अधिक ग्रामस्थ ग्रामपंचायतीवर धडकले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button