
ग्रामपंचायत कर्मचारी 28 रोजी धडकणार अधिवेशनावर
रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी विविध मागण्यांसाठी दि. 28 रोजी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सचिव कृष्णा होडे यांनी दिली आहे.
शासनाच्या जनकल्याणकारी योजना राबविण्याची महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायत कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी एकवटले आहेत. आपल्या मागण्या पूर्णत्वास जाण्यासाठी संघटना आक्रमक झाली आहे.
अभय भावलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे वेतनश्रेणी शासनाने लागू करावी, यासाठी ग्रा.पं. कर्मचारी अधिवेशनावर धडकणार आहेत. यात वसुलीच्या अटी शिथील करावी तसेच सुधारित वेतनाची 100 टक्के रक्कम शासनाने द्यावी या मागण्यांकडे मोर्चाद्वारे लक्ष वेधले जाणार आहे.
या अधिवेशनावरील मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष किरण पांचाळ, कृष्णा होडे, संजय खताते हे करणार आहेत. यासाठी जिल्ह्यातून 200 पेक्षा जास्त कर्मचारी हजर राहणार आहेत.




