
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांतून विनाअडथळा वेगवान प्रवास
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून विनाअडथळा वेगवान प्रवासामुळे वाहनचालकांची ’डोकेदुखी थांबली आहे. दोन्ही बोगद्यातील अंतर्गत समस्यांचा निपटारा करण्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याला यश आले आहे. सद्यस्थितीत बोगद्यातून प्रवास करताना कोणतीही समस्या उदभवत नसल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. चौपदरी वाहतुकीमुळेही वाहतूक व्यवस्थत सुरळीतपणा आला आहे. बोगद्यातील समस्या संपुष्टात आल्या असल्या तरी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सुसज्जता ठेवण्यात आली आहे.
कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यापासून आजवर अनेक विघ्ने निर्माण होवून वाहनचालकांच्या मार्गात अडथळ्यांचा ’स्पीडब्रेकर’च उभा ठाकला होता. विशेषतः सणांच्या कालावधीत डोके वर काढणार्या समस्यांमुळे कोकणवासियांचा जीव टांगणीवर रहायचा. दोन्ही बोगद्यातील गळती, खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे दोन्ही बोगद्यातील प्रवास चर्चेचाच विषय ठरला होता. बोगद्यात निर्माण होणार्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून कसोशीचे प्रयत्न केले जात होते. मात्र तरीही ऐनकेन कारणाने बोगद्यात अडथळे निर्माण होवून वाहनचालकांना कसरतच करावी लागत होती. मार्गिकतील खंडित वीजपुरवठ्यामुळे वाहनचालकांची फसगत होत होती. दोन्ही बोगद्यातील गळती थोपवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने पुन्हा ग्राऊटींगचा अवलंब करत गळतींच्या समस्येतून वाहनचालकांची सुटका केली आहे. खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्नही निकाली काढण्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याला यश आले आहे.www.konkantoday.com




