रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्ताने…


 *१४ जानेवारी १८२८* रोजी रत्नागिरी मध्ये *कोकण बुक सोसायटी* या नावाने ही संस्था स्थापन झाली. त्या स्थापनेला या १४ जानेवारी २०२६ ला *१९८ वर्ष* पूर्ण होत आहेत. 

सुसंस्कृत रत्नागिरी चा मान बिंदू
१९८ वर्षांची साथ रत्नागिरीला देणाऱ्या या ग्रंथालयाने इतक्या प्रदीर्घ प्रवासात रत्नागिरीचा सुसंस्कृत, ग्रंथप्रेमी तोंडावाळा केवळ जपला नाही तर तो अधिक प्रभावी बनवला.
जनाश्रयातून साकारत गेलेला ज्ञानयज्ञ
एखादी संस्था १९८ वर्षांचा अविरत प्रवास करते कारण या संस्थेची नाळ इथल्या समाज मनाशी जोडलेली असते. कोणतीही आर्थिक स्वायत्तता निर्माण करता येण्यासारखी स्वतःची साधनं, स्वतःचं भांडवल नसताना रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय जनाश्रयावर १९८ वर्ष ग्रंथसेवा करत त्या त्या काळातल्या वाचकांची वाचनतृष्णा पूर्ण करत आहे. वाचनालयाची ही सेवा ऐतिहासिक आहेच, त्याच बरोबर वाचनालयासारख्या सरस्वतीमंदिराची आराधना करणारा सुजाण समाज रत्नागिरी मध्ये सातत्याने नांदतो आहे. वाचनाचे महत्व समजलेल्या अनेक पिढ्या, त्यांनी वाचनालयातील ग्रंथसंपदेतून वेचलेले ज्ञानकण, त्याचे संस्कार, रत्नागिरीतल्या मातीत सातत्याने रुजले म्हणून रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय इतका प्रदीर्घ प्रवास करते झाले, असे नमूद करताना मन अभिमानाने बहरून येते.
दुर्मिळ ग्रंथांचे माहेरघर
हे वाचनमंदिर ग्रंथसंपदेने परिपूर्ण राहिले चोखंदळ वाचकाला त्याचा वाचन ध्यास जोपासणासाठी जे ग्रंथ पाहिजेत ते ते ग्रंथ या प्रदीर्घ वाटचालीत वाचनालयाने आपल्या दालनात सजवले. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात जुने पण ग्रंथसंपदेने परिपूर्ण असे हे वाचनमंदिर “दुर्मिळ पुस्तकांचे माहेरघर” म्हणून प्रसिद्धी प्राप्त आहे.

   *सुजाण समाजाच्या सानिध्यात रमलेल हे सरस्वतीमंदिर*

जे. एच. टॉर्ट, न्यायमूर्ती खारेघाट, स्वामी स्वरूपानंद ,स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रमाणे त्या त्या कालखंडातील महनीय व्यक्तिमत्वांची नावे या वाचनालयाच्या जडणघडणीशी जोडली गेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील, स्वातंत्र्योत्तर काळातील, जागतिकीकरणाच्या काळातील आणि आता डिजिटल युगातील रत्नागिरीच्या स्पंदनांशी हे वाचनालय सलग्न राहिले आहे.
बदलती शासनव्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था यांना आत्मसात करत हे वाचनालय परिस्थितीशी जुळवून घेत इथपर्यंतचा प्रवास झाला आहे. त्या त्या कालखंडात वाचनालयाच्या विकासासाठी झटणारे कार्यकर्ते हे वाचनालयच शक्तिस्थान राहिले आहे. कार्यकर्त्यांच्या अविरत प्रयत्नांतून वाचनालयाचा मार्ग प्रशस्त होत गेला हे नमूद करणे गरजेचे आहे.
१९८ वा वर्धापनदिन खूप महत्वाचा वाटतो. नवी प्रशस्त, सुशोभित, अद्ययावत वास्तू या वर्षी वाचनालयाला लाभली. त्यामुळे आता आणखी एका शतकाचा प्रवास करण्यासाठी स्वतःच सुसज्ज संकुल या वर्षाने वाचनालयाला दिले. वाचनालयाची प्रदीर्घ परंपरा नव्या पिढीकडे सुपूर्त करताना ऐका अद्ययावत व्यवस्थेसह ती सुपुर्त होणार आहे. वाचन संस्कार जिथे अधिक प्रबळ होतो, ते वाचनमंदिर १९८ वर्षी नव्या अत्यंत देखण्या स्वरूपात की जिथे वाचकाला हवाहवासा वाटणारा शांतपणा आहे, भरपूर प्रकाश आहे, भरभरून असलेली ग्रंथसंपदा उपलब्ध आहे आणि ग्रंथांसाठी स्वतंत्र भव्य नेटका विभाग आहे. २००० चौ. फूट क्षेत्राचा स्वतंत्र ग्रंथविभाग आणि त्यात आसनस्थ झालेली बहुविध ग्रंथसंपदा या वाचनालयाच्या वैभवात अखंड भर घालत आहे, वाचकांच प्रेम त्यांचा सहवास वाचनालयाचं सौष्ठव वाढवत आहे.
बहुविध साहित्य प्रकाराने ओतप्रत असलेले ग्रंथ आणि वाचक यांचा ज्ञानसंगम घडवून आणणारं हे मंदिर आज १९८ वर्षांचं होत आहे. पुढच्या दोन वर्षात उत्कृष्ट असं ऑडिटोरियम, आंतरराष्ट्रीय डिजिटल लायब्ररींना जोडणारी डिजिटल लायब्ररी, डिजिटलायझेश, उत्तम अभ्यासिका, विविध कलाविष्कारांसाठी दालन, स्वातंत्र्यवीर सावरकर कम्युनिटी हॉल अश्या विविध उपक्रमांनी हे वाचनालय रत्नागिरीतील उत्तम सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याचा चंग बांधला आहे.
रत्नागिरीतील सुजाण नागरिकांनी वर्गणीदार वाचक सभासद होऊन या पुरातन ज्ञानमंदिरात आवर्जून येते राहावे, हे वाचनमंदिर नित्य नव्या उत्साहात प्रत्येकाचे स्वागतासाठी आतुर आहे.

पुरातन अश्या या वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्ताने सर्व वाचनप्रेमींना ही शुभेच्छा.. !

अॅड. दीपक पटवर्धन
अध्यक्ष
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय
रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button