
आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान योजना24 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करा
रत्नागिरी, दि. 24 ):- आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्याबाबतची योजना 28 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार नव्याने सुरु करण्यात आली आहे. आणीबाणी कालावधीत कारावास भोगलेल्या आणि या योजनेचा लाभ न घेतलेल्या आणीबाणीधारकांना नव्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत 24 नोव्हेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती 2 जानेवारी 2018 पूर्वी हयात नसल्यास त्याच्या पश्चात हयात जोडीदार पती/पत्नी केवळ अशा व्यक्तींनी अनुज्ञेय असलेले मानधन मिळण्याकरिता अर्ज सादर करण्याची मुदत 25 सप्टेंबर होती आता याकरीता 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
15 सप्टेंबर 2018 च्या शासन पूरक पत्रासोबतच्या परिशिष्ट ब मधील शपथपत्र अर्जासोबत जोडावे. सन 1975 ते 1977 मधील आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदिवास भोगावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्यासंबंधीच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत 26 ऑगस्ट 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. हा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 90 दिवसांपर्यत अर्ज दाखल करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.




