
आयुष्यमान कार्ड महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य कार्ड चा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावातालुकानिहाय यंत्रणा कार्यरत करुन गतीने काम करा -एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 4 ):- आयुष्यमान कार्ड व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य कार्डची संख्या वाढवून कुटूंबांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत करा. आशा वर्कर यांची मदत घेवून तालुकानिहाय गतीने काम करा. महिन्याभरात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या अंतर्गत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी आज तालुकानिहाय आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी आयुष्यमान कार्ड व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना कार्ड किती प्रलंबित आहेत याचा आढावा तालुकानिहाय घेतला. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्हा यामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये यायला हवा अशा पध्दतीने आवश्यक ती सर्व यंत्रणा कार्यरत करा. आशा वर्कर, शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्यापासून कार्ड बनवायला सुरुवात करा. प्रलंबित असणारे उद्दिष्ट महिन्याभरात पूर्ण व्हायला हवीत अशा पध्दतीने जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष देवून नियोजन करावे.
15 ते 30 सप्टेंबर कालावधीत गोवर व रुबेला लसीकरण
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गोवर व रुबेला आजाराचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने आश्रमशाळा, मदरशांमधील बालकांकरिता 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये 10 आश्रमशाळा व 12 मदरशांमधील 5 ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना हे लसीकरण देण्यात येणार आहे. याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी या मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली.