
पुढचा काळ नक्कीच चांगला!राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या भावना
राजकारणात कटुता निर्माण झाल्यानंतर आता ठाकरे बंधूंमध्ये सौहार्दाचे क्षण पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.या शुभेच्छांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, युतीचे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे. दोघांमधील ताणतणाव कमी होऊन नवे समीकरण तयार होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेले आणि मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘पुढचा काळ नक्कीच चांगला!’असे भावनिक विधान केल्याने दोघांचे मनोमिलन सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे बोलले जात आहे. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. ”भेटीमुळे आनंद द्विगुणित झाला. खरे तर द्विगुणित नाही, अनेक पटींनी आनंद वाढला. अनेक वर्षांनी भेटलो आणि तेही आपल्या बालपणाच्या आठवणींनी भरलेल्या खोलीत. त्यामुळे हा क्षण खूप खास आहे, पुढचा काळ नक्कीच चांगला!”असे त्यांनी सांगितले.