
सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृतरीत्या राज्यातील पहिला ‘एआय’ युक्त जिल्हा झाला.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आणि मार्बल कंपनी यांच्यात ‘एआय’बाबत सामंजस्य करार करण्यास राज्याच्या मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृतरीत्या राज्यातील पहिला ‘एआय’ युक्त जिल्हा झाला आहे. यानंतर राज्यात जे जिल्हे ‘एआय’ करायचे असतील, त्यांना पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात याबाबत केलेल्या कामाचा अभ्यास करावा लागेल. हे आपल्या जिल्ह्यासाठी भूषणावह आहे, अशी माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.जिल्हाधिकारी बैठक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री राणे बोलत होते.
जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, मार्बल कंपनीचे हर्ष पोतदार आणि साई कृष्णन आदी उपस्थित होते. बदली होऊन गेलेले या प्रकल्पाचे समन्वयक तथा अपर पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले ऑनलाईन सहभागी झाले.पालकमंत्री राणे म्हणाले, ”१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’युक्त जाहीर केला होता.
आरोग्य, कृषी, पोलिस आणि आरटीओ हे चार विभाग एआय तंत्रज्ञानाला जोडले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मार्बल आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठी मान्यता देण्याबाबत राज्याकडे प्रस्ताव दिला होता. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चस्तरीय समितीने बैठक घेत यासाठी मान्यता दिली आहे. ही मान्यता मिळाल्याने जिल्हा प्रशासनाला राज्यातील पहिला ‘एआय’ युक्त जिल्हा म्हणून मान्यता मिळाली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे.”