
अर्जुना नदी काठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा.
राजापूर तालुक्यात जोरदार पावसामुळे पूर्व परिसरातील करक येथील अर्जुना धरण हे ९० टक्के भरले आहे. पाऊस सतत पडत राहिल्यास पुढील दोन, तीन दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अर्जुनासह कोदवली नदीच्या पाण्याची धोका पातळी ओलांडण्याची शक्यता लक्षात घेऊन नदी काठावरील गावांसह शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसे पत्र ग्रामपंचायतीना प्रशासनाने पाठविले आहे.यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली असून जूनमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले होते. जुलै महिन्यात देखील तेवढ्याच जोमाने पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे पूर्व परिसरातील करक येथील अर्जुना धरण हे जवळपास ९० टक्के भरले आहे. पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.त्यामुळे राजापूर शहरासह नदीकाठावरील गावच्या ग्रामपंचायतीना पाटबंधारे उपविभाग लांजा यांच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अर्जुना नदीच्या काठावर करक, तळवडे, पाचल, रायपाटण, चिखलगांव, गोठणे-दोनीवडे, शिळ, उन्हाळे, कोळवणखडी, सौन्दळ, आडवली, परटवली, बागवेवाडी आदी गावे येतात. सर्व गावच्या ग्रामस्थांना खबरदारीबाबत कल्पना देण्यात यावी अशा सूचना त्या गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांना देण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com