
राज्यातील प्रवासी, मालवाहतूक संघटनांना येत्या दोन जुलैपासून बेमुदत संपावर
राज्यातील प्रवासी, मालवाहतूक संघटनांनी येत्या दोन जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित वाहनचालकांकडून जबरदस्तीने ई-चलनाद्वारे दंड आकारला जात असून, शहरांमधील वाहतुकीस प्रतिबंधात्मक प्रवेश, तक्रार निवारण प्रक्रियेत होणारा विलंब, अतिरिक्त कामगारांची सक्ती आणि इतर मागण्यांसंदर्भात आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करूनही कुठलीच दखल न घेतली जात नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वाहन, चालक, मालक आणि प्रतिनिधी महासंघाने बुधवारी पत्रकाद्वारे केला.प्रवासी आणि माल वाहतूक करणाऱ्या राज्यातील विविध संघटनांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. यावेळी वाहतूक संघटना महासंघाचे अध्यक्ष डाॅ. बाबा शिंदे, वाहतूकदार बचाव कृती समितीचे संयोजक उदय बर्गे, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे प्रकाश गवळी आणि इतर संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारने दहा दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी बंद करण्याबाबत एकमत झाले. याला राज्यातील सर्व वाहन संघटना, वाहतूकदारांनी पाठिंबा दिला असल्याचे पत्रकात नमूद केले आहे