
रत्नागिरीतील हवामान केंद्राला कोणीच वाली नाही, महत्त्वाच्या दिवसात कार्यालयाला कुलूप
सध्या राज्यात व कोकणातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा राज्याच्या हवामान विभागाने दिला आहे मात्र इशारा देणाऱ्या रत्नागिरी हवामान खात्याचे कार्यालय चक्क बंद अवस्थेत घेतल्याने खळबळ उडाली आहे रत्नागिरीत पावसाच्या मुसळधार सरी व वेगाने वारे वाहत आहेत पावसामुळे कोणत्याही क्षणी आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा स्थितीत रत्नागिरीतील हवामान विभागात निद्रिस्त स्थितीत आहे. रत्नागिरीतील नाचणे येथील भारतीय हवामान शास्त्र विभागाला कुलूप असल्याचे आढळून आले लाखो रुपये खर्च करून येथे यंत्रसामुग्री उभारण्यात आली आहे. तर अधिकाऱ्यांसह सात ते आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही कार्यालय बंद कसे काय होते हा प्रश्न निर्माण झाला आहे
भारत सरकारच्या हवामान खात्यांतर्गत भारतीय हवामान शास्त्र विभाग रत्नागिरीतील नाचणे येथे कार्यरत आहेत. कार्यालयाच्या इमारतीच्या बाजुला स्वयंचलित मौसम स्टेशन कार्यान्वित आहे. तर हवामानाची स्थिती दर्शवणारी यंत्रणा इमारतीच्या टेरेसवर बसविण्यात आले आहे.
हवामानाच्या बदलत्या नोंदी ठेवण्यासाठी रत्नागिरीत या विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी एक अधिकारी व सात ते आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मुंबईतील कुलाबा येथील हवामान केंद्राच्या अखत्यारीत या केंद्राचे कामकाज चालते. परंतु सद्यस्थितीत रत्नागिरीतील हवामान केंद्राला कोणीच वाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोमवारी दुपारी 1 वाजता हवामान केंद्राला कुलूप लावून अधिकाऱ्यांसह कर्मचारी गायब झाले होते. हवामान केंद्राच्या आवारातच अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. तरीही कार्यालयाला कुलूप असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे