
शिडी तुटल्याने किल्ले सुमारगडावरील ग्रामस्थांचा संपर्क तुटलेलाच.
खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कामिनी, वाडीमालदे, विहाळी, वाडीबेलदार या गावांच्या सीमेलगत असलेल्या किल्ले सुमारगडावरील लोखंडी शिडीवर दरड कोसळून ग्रामस्थांचा मार्गच बंद झाला आहे. अजूनही संपर्क तुटलेला असतानाही दुरूस्तीची तसदी घेण्यात आलेली नाही. शिवकालीन पायवाटांची तातडीने स्वच्छतेसह डागडुजी करण्याची मागणी शिवभक्तांनी केली आहे.गडावर शिवप्रेमींची सतत वर्दळ असते. शासनाने गडाच्या डागडुजीकडे आजवर दुर्लक्ष केले आहे.
किल्ले सुमारगडाकडे जाणार्या सर्व पायवाटा घनदाट जंगलातून जातात. कमीत कमी दोन तास पायपीट करून सुमारगडावर जावे लागते. वाडीमालदे येथील काही दानशूर शिवप्रेमींनी गडावर जाणार्या दोन अवघड ठिकाणी लोखंडी शिड्यांची व्यवस्था केली होती. यामुळे शिवभक्तांचा गडाकडे जाणारा मार्ग सुकर झाला होता.आठवड्यापूर्वी मुसळधार पावसात किल्ले सुमारगडावर लावलेल्या लोखंडी शिड्यांच्या वरच्या टप्प्यावरील दरड शिड्यांवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.www.konkantoday.com