सरकारमधील मंत्रीच जातीय विद्वेषाची भाषा करत आहेत जितेंद्र आव्हाड यांची मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका

. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी मिरकरवाडा बंदरावरील मच्छीमारांबरोबर चर्चा केली.तसेच जिहाद्यांची वळवळ खपवून घेणार नाही, असा इशारा देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर येथील विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. याकारवाईवरून आता आव्हाड यांनी उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन थेट राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी राणे सिंधुदुर्गातून जातीय विद्वेष पसरवत असल्याचा आरोप केला आहे. ते पदाधिकाऱ्यांशी संवाद तसेच मिरकरवाडा येथील जेटीची पाहणी केल्यानंतर बोलत होते.स्थानिक स्वराज्य निवडणूका घेतल्या जात नाहीत, ओबीसी आरक्षणाचाही खेळ मांडला आहे. यामुळे आता रस्त्यावर येऊन लढाई लढावी लागणार आहे.

यासाठीच रत्नागिरी दौऱ्यावर आलो असून घरात बसून कुठलीही लढाई लढता येणार नसल्याची प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. तसेच त्यांनी कोकणात राष्ट्रवादीसाठी चांगलं वातावरण असून कोकण हा वैचारीक प्रदेश आहे. पण सध्या येथे सिंधुदुर्गमधून जातीय विद्वेषाची भाषा पसरवली जातेय असा दावा केला आहे.हा दावा करताना आव्हाड यांनी थेट मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, सरकारमधील मंत्रीच जातीय विद्वेषाची भाषा करत आहेत. त्यांना संविधानावर हात ठेवून घेतलेल्या शपथेचा विसर पडला आहे.

संविधान हे समता आणि समानतेवर आधारित असल्याचाच त्यांना विसर पडला आहे. ही परिस्थिती समाजाला घातक आणि समाजात अस्वस्थ पसरवणारी असल्याची टीका त्यांनी केलीय.सरकारबद्दल लोकांमध्ये नाराजीचे वातावरण असून बहुमत असतानाही लोककल्याणकारी योजना राबविण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत. शेतकरी कर्जमाफीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, मी असे म्हणालोच नाही, असे सांगत फिरत आहेत. एका विशिष्ठ गटाचे व पक्षाचे कार्यकर्ते धार्मिक तणाव कसा वाढेल याकडे लक्ष देत फिरत आहेत. कुणी बेकारीवर, महागाईवर, महिलांवरील अत्याचारावर, कायदा व सुव्यस्थेवर बोलायला तयार नाहीत. सर्वत्र अपयश असतानाही धार्मिक विद्वेष पसरवण्याचे काम मात्र सरकारमधीलच लोक करत आहेत. सध्या पुरोगामी महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे काम सुरू आहे.

गुण्यागोविंदाने राहणाऱ्या समाजाचे तुकडे करून काय साध्य होणार आहे, हेच समजत नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.यावेळी त्यांनी, पहलगाम हल्ल्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, पहलगाम येथील प्रकारानंतर काश्मीरी लोकांनी आपला जीव धोक्यात घालून पर्यटकांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. पण घटना घडली तेव्हा तिथे एकही सैनिक नव्हता. हे धक्कादायक असून केंद्र सरकारचे ते अपयश आहे. यासंदर्भात कुणी प्रश्न विचारला? तर त्याला ताब्यात घेतले जाते.

मात्र त्या घटनेच्या जबाबदारीवर कोणीही बोलायला तयार नाही.राष्ट्रावर झालेल्या आक्रमणाविरोधात पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पाकिस्तानला जो काही धडा शिकवायचा आहे, तो शिकवा. मात्र देशातील सैनिकांची संख्या कमी का, यावर उत्तर द्यायला कोणी नाही. सैनिकांना पेंशन दिली जात नाही. मात्र जनतेपासून काहीतरी लपवून ठेवून द्वेषाचं राजकारण केले जात आहे. सध्या स्वतःचं राजकीय अपयश झाकण्यासाठी हिंदू-मुस्लिम असे कोंबडे झुंजवले जात आहेत, अशी टिका आव्हाड यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button