
ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग असण्याचा तसेच मतमोजणीमध्ये काही छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्र पत्रकार परिषदेत जाहीर केले. ७० आमदार असलेल्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपणार आहे.दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे.
दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. यावेळी नाव न घेता राजीव कुमार यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, ईव्हीएम मधील छेडछाड, मतदार याद्यांमधील घोळ आणि वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेवटच्या पाच तासांत मतदानाची टक्केवारी कशी वाढलीयाबाबतही स्पष्टीकरण दिले. दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर करताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “ईव्हीएममध्ये कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग असण्याचा तसेच मतमोजणीमध्ये काही छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
देशातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने हेच सांगितले आहे की, ईव्हीएम टेम्परिंगचे आरोप निराधार आहेत.” असं राजीव कुमार म्हणाले. दरम्यान राजीव कुमार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. आरोप करताना हवेत गोळीबार करण्याची गरज नाही. तुम्ही पुरावा दाखवा, या ठिकाणी असं घडून येतं आहे हे सांगा आम्ही कारवाई करु. मागच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या दरम्यान एक हो हल्ला पाहण्यास मिळाला. तो म्हणजे आमचं हेलिकॉप्टर तपासत आहात, त्यांचं का नाही तपासलं? यांचं का नाही तपासलं? घाणेरड्या भाषेचा उपयोगही केला गेला.
आम्ही उत्तर दिलं नाही संयम ठेवला. मतदानाच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना धमक्या देण्यापर्यंत काहींची मजल गेली. मात्र आम्ही शांत बसलो. स्टार प्रचारक आणि राजकीय नेते यांनी शिष्टाचार आणि सभ्यता पाळली पाहिजे. महिलांच्या विरोधात बोलू नका, मुलांच्या विरोधातही काहींनी भाष्य केलं. अशा लोकांना आमची हात जोडून विनंती आहे की प्रचाराची पातळी एवढी घसरु देऊ नका की त्यामुळे मतदानाला येण्याची नव्या पिढीची इच्छाच निघून जाईल. प्रचाराच्या वेळी शालीनता ठेवली पाहिजे.