
टाकाऊ वस्तूंपासून केली इंधननिर्मिती गौरेश सुनील पाटील यांचा यशस्वी प्रयोग
लाकूड गिरणीत तयार होणारा भुसा, ऊसाची चिपाड आणि भाताचा कोंडा या टाकाऊ वस्तूंचा वापर करून जळणासाठीचे ब्रिकेटस (कांडी कोळसा) बनवण्याचा अनोखा फंडा सडामिर्या (ता. रत्नागिरी) येथील तरूण गौरेश सुनील पाटील यांनी यशस्वी केला आहे. अभियंता गौरेशने ऐन कोरोना कालावधीत या उद्योगाचा स्टार्टअप सुरू करत दगडी कोळशाला पर्याय ठरवणारे पर्यावरणपूरक इंधन उपलब्ध करून दिले आहे. रत्नागिरीतील प्रक्रिया उद्योगांनी त्यावर पसंतीची मोहर उमटवली आहे.
फळ किंवा मत्स्य प्रक्रिया उद्योगांसह विविध कारखान्यात बॉयरलसाठी दगडी कोळसा वापरतात. तो जाळून प्रदूषण होत असल्याने कंपन्यांमार्फत पर्यावरणपुरक पर्यायी इंधनांचा वापर करण्याकडे कल आहे. हे लक्षात घेत गौरेश पाटीलने चिपळूणमध्ये शिक्षण घेताना बॉयलरसाठी लागणार्या इंधनाबाबत माहिती घेतली. काही कंपन्या खर्च कमी करण्यासाठी कोल्हापूरमधून उसाच्या चिपाडापासून बनवलेले ब्रिकेटस वापरतात. याच धर्तीवर गौरेशने लाकडाचा भुसा, उसाची चिपाड आणि भाताचा कोंडा यापासून ब्रिकेटस बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री गुजरातमधून तर ड्रायर पंजाबमधून मागवला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही सर्व यंत्रसामुग्री अडकली. कृषी आधारित प्रकल्प असल्यामुळे कोरोना पहिल्या लाटेतील प्रादुर्भाव ओसरल्यानंतर यंत्र दाखल झाली.
सडामिर्या येथे कातळावरील मोकळ्याजागेत नोव्हेंबर २०२० मध्ये हा उद्योग सुरु केला. एका महिन्याला २५० ते ३०० टन ब्रिकेटस ते बनवतात. त्यासाठी लागणारा भुसा रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर तालुक्यातील लाकडाच्या गिरणीमधून आणला जातो तर उसाची चिपाड मिरजोळे एमआयडीसीत उसावर प्रक्रिया करणार्या एका कंपनीकडून मिळतात. सुमारे ३०० टन चिपाड त्याने विकत घेतली आहेत. भुसा ३ रूपये ६० पैसे प्रतिकिलो दराने तो विकत घेतो. ९० मिलिमीटर व्यास आणि ८ इंच लांब असे तुकडे बनविले जातात. या उद्योगासाठी पन्नास लाखांची गुंतवणूक आहे. रत्नागिरीतील तीन ते चार कंपन्यांना आवश्यक ब्रिकेटस पुरवले जातात. महिन्याला सर्वसाधारणपणे तीस हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो. दगडी कोळसा प्रतिकिलो १० रुपयांपासून पुढे मिळतो तर ब्रिकेटसचा दर ६ रुपये इतका असतो. www.konkantoday.com