
रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा विषयक जनजागरण अभियान राबविण्याचा समविचारी मंचचा निर्णय
रत्नागिरीः मुलभूत आरोग्य सेवा सुविधा हा भारतीय संविधानाने सामान्य जनतेला दिलेला हक्क आहे.या हक्काची पायमल्ली होता नये.रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णतः ढासळलेली आहे.गेली पंधरा ते वीस वर्षे ही ओरड आहे.आजवरचे राहू द्या निदान कोरोना सारख्या महाभयंकर संकटात तरी या प्रश्नाची तड लावण्यासाठी जिल्ह्यातील तडफदार लोकप्रतिनिधी पुढे येतील ही अपेक्षा होती पण ती फोल ठरली.जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना लागण झालेल्या रुग्णांना उपचारासाठी आणि वैद्यकीय इलाजांसाठी एकही निष्णात फिजिशियन नसावा हे अपयश कोणाचे ? असा संतापजनक सवाल महाराष्ट्र समविचारी मंचने उपस्थित केला आहे.
समविचारी मंच प्रमुख बाबासाहेब ढोल्ये,राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,महासचिव श्रीनिवास दळवी,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आजगांवकर, राज्य महिला समन्वयक राधिका जोगळेकर,राज्य महिला संघटक स्मिता कुलकर्णी,राज्य सोशल मिडिया प्रमुख सुप्रिया भरस्वाडकर,रायगड महिला अध्यक्ष अँड.वर्षा पाठारे,युवा प्रमुख निलेश आखाडे,जिल्हा युवा प्रमुख अमित मराठे,आदींनी केला आहे.
याविषयी बोलताना या पदाधिका-यांनी सांगितले की,जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हा एकच विषय घेऊन आम्ही संपूर्ण जिल्ह्यात जनजागरण मोहिम सुरु केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून समविचारी मंचच्या वतीने आम्ही १५ अॉगष्ट रोजी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले.तरीही जिल्हा प्रशासनाने वा जिल्ह्यातील कुणाही लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले दिसले नाही.
मुलभूत आरोग्य हा भारतीय संविधानांनी दिलेला हक्क आहे.या प्रश्नी जी सजगता शासन आणि लोकप्रतिनिधी यांना हवी ती दिसत नाही म्हणून समविचारी मंचच्या वतीने जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्य यंत्रणा सावरण्यासाठी सामान्य जनतेच्यात जागृती करुन आरोग्य प्रश्नावर जनजागृती मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.पक्षीय अभिनिवेश न बाळगता राबविण्यात येणाऱ्या या अभियानांत जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था,सामाजिक कार्यकर्ते यासह राजकीय पक्षांनी एक सामाजिक ऋण म्हणून सहाभागी व्हावे असे आवाहन समविचारी मंचने केले आहे.
या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सव्वालाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना दिले जाणार आहे.त्यानंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठराव मिळविले जाणार आहेत.
जिल्ह्यातील रुग्णांची वाढती मृतसंख्या पहाता अपुऱ्या वैद्यकीय सुविधा,तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता,अपुऱ्या संख्येने असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर पडणारा अतिरिक्त भार लक्षात येतो.यास्थितीत जिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिथे जिथे जिल्ह्यात कोवीड रुग्णालये जाहीर झाली अशा एकाही ठिकाणी त्या त्या स्थानिक स्तरावरील एकाही लोकप्रतिनिधींनी साधी भेट दिल्याचे ऐकिवात नाही.इतर सर्व राहू द्या सर्वप्रथम आम्हांला सुसज्ज आरोग्य सुविधा द्या.असे सांगून विद्यार्थ्यांच्या आरोग्य हितासाठी परिक्षा पद्धतीचा घोळ घालणाऱ्या शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी सर्वप्रथम आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भर द्यावा असेही समविचारींनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील सुजाण नागरिकांनी या प्रश्नावर यावे आणि हा प्रश्न धसास लावण्यासाठी आपली ताकद पणाला लावावी असे कळकळीचे आवाहन समविचारी मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com