
रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिलच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
रत्नागिरी : रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव उपस्थित होते.
या कार्यक्रमात बार कौन्सिलचे नवनिर्वाचित सदस्य ॲड. पारिजात पांडे, ॲड. उदय वारुंजीकर, ॲड. विठ्ठल कोंडेदेशमुख, ॲड. विवेकानंद घाटगे, ॲड. अहमदखान पठाण, ॲड. रंजना भोसले, ॲड. माधवी पोतदार यांचा सन्मान करण्यात आला. श्री. जाधव, रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे आणि उपाध्यक्ष ॲड. शाल्मली आंबुलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येने बार कौन्सिलचे सदस्य हजर राहणे हे रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.
रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी प्रास्ताविकामध्ये विविध मागण्या बार कौन्सिलच्या सदस्यांकडे मांडल्या. तरुण वकिल सहाय्य निधी, वकिल संरक्षण कायदा, वकिलांच्या विरुद्धच्या तक्रारीचा जलदगतीने निपटारा, सुरक्षेसाठी दक्षता समिती गठित करणे, वेल्फेअर फंड योजना आदी मागण्या मांडल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव म्हणाले की, बार असोसिएशन ही वकिलांची मातृसंस्था असून रत्नागिरीतून न्यायाधीशही तयार होण्याकरिता बार असोसिएशनच्या सहकार्याने व्याख्यानांचा कार्यक्रम सुरू केला आहे. असेच सहकार्य कौन्सिलने नेहमी ठेवावे.
ॲड. पांडे म्हणाले, मी रत्नागिरीत २०१३ पासून येत आहे. सर्व वकिलांशी संपर्क, संवाद आहे. तरुण वकिलांची संख्या वाढत आहे. तंत्रज्ञानाचा वापर व वकिली हे आपल्याला शिकवले. परंपरागत वकिलीत १० वर्षांत नव्याने गोष्टींची भर पडत आहे. इमारती महत्वाच्या आहेत. सुविधा, भव्यता, महिला वकिलांसाठी सुविधा, ५० वर्षांचा विचार. एकदिलाने काम करत आहोत. कोल्हापूर खंडपीठाने नवीन दालन तरुणांसाठी खुले झाले आहे. या खंडपीठात महिन्यात एकदा काम असेल नसेल तरी जा. कौन्सिलतर्फे महाराष्ट्रात अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर, नव्या वकिलांसाठी नवीन दालने, महिलांच्या समस्यांकडे लक्ष देणे अशा सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यात येईल.
ॲड. वारुंजीकर म्हणाले, अध्यक्षांनी केलेल्या मागण्या आर्थिक विषयांवर अवलंबून आहेत. रुल ४० प्रमाणे वकिलांसाठी निधी उपलब्ध करून मार्ग काढू. समन्वय समितीत बार असोसिएशनचे प्रतिनिधी असतील. ज्येष्ठ वकिलांसाठी नवीन नियम आले. ट्रायल लेव्हलला असलात तरी टर्म १६ प्रमाणे डेसिग्नेशन मिळू शकते. ॲड. कोंडेदेशमुख यांनी रत्नागिरीतील वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. अपघातग्रस्त वकिलांसाठी अर्ज केल्यास मदत मिळू शकते. प्रशिक्षण कार्यक्रमही कौन्सिलतर्फे आयोजित केला जातो. ॲड. घाटगे यांनी कोल्हापूर खंडपीठामध्ये कोकणातील वकिलांनी आवर्जून यावे, असे आवाहन केले. ॲड. पठाण यांनी सांगितले की, मी सलग ४ वेळा कौन्सिलवर निवडून गेलो आहे. ॲडव्होकेट वेल्फेअर फंडामध्ये २ रुपयांऐवजी ५० रुपयांचे तिकीट घ्यावे. त्यातून कनिष्ठ वकिलांना व ज्येष्ठांनाही मदत करणे शक्य आहे. ज्येष्ठ वकिलांनी मदत करावी.
ॲड. रंजना भोसले यांनी सांगितले की, बार कौन्सिलमध्ये एक लाख महिला वकिल कार्यरत आहेत. महिला वकिलांनी शंभर टक्के मतदानात सहभाग घेतला पाहिजे. सध्या आरक्षणामुळे आम्हा ५ महिला सदस्यांना संधी मिळाली आहे. महिलांनी आपल्या समस्या आमच्याकडे मांडाव्यात. ॲड. पोतदार म्हणाल्या की, कोकण ही भूमी फक्त निसर्गरम्य नाही तर संघर्ष, पराक्रम, संस्कार व विचार या सर्वाचे प्रतिक आहे. महिलांच्या सेवेसाठी बांधील आहे व बांधील राहू. माझे गुरु ॲड. वारुंजीकर यांच्या समवेत सत्कार केलात, त्याबद्दल खूप आभार मानते.
ॲड. शाल्मली आंबुलकर यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन ॲड. अवधूत कळंबटे यांनी केले. कार्यक्रमास रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वकील, विधिज्ञ, बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमास बार असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सर्व महिला, पुरुष वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी विधी सेवा प्राधिकरण इमारतीच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.




