रॅगिंगप्रकारातील दोषी विद्यार्थ्यांवर महाविद्यालयांतर्गत कारवाई झालीच पाहिजे

शिवसेना (ठाकरे) युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकत्याच घडलेल्या रॅगिंगप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या (ठाकरे शिवसेना) पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेतली. दोषी
विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढावे अशी आमची टोकाची भूमिका नसली तरी या घटना रोखण्यासाठी त्या विद्यार्थ्यांवर महाविद्यालय अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी केली आहे. तसेच आपण त्यांच्या चुकांवर पांघरुण घातले, तर मात्र आम्ही आमच्या स्टाईलने धडा नक्की शिकवू असा, इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांच्यासह, युवासेना शहरप्रमुख आशिष चव्हाण, नाचणे विभाग समन्वयक रितेश लोखंडे उपस्थित होते. याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले असून, दोषी विद्यार्थ्यांवर लवकरात लवकर कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, “आपल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच रॅगिंग प्रकार उघडकीस आला. रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून कारवाई करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे आपल्याकडेही ह्याबाबत आपली व्यथा मांडली. शहर पोलीस याबाबत आपली कारवाई नक्की करतील. पण एक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून आपली भूमिका काय? आपण रॅगिंग संबंधित विद्यार्थ्यांवर कोणती कारवाई केली? हे अद्याप आम्हाला समजलेले नाही. या रॅगिंग प्रकरणात जे विद्यार्थी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही या निवदेनाद्वारे करत आहोत.”
“या विद्यार्थांना महाविद्यालयातून काढावे अशी आमची टोकाची भूमिका नसली, तरी या घटना रोखण्यासाठी त्यांच्यावर महाविद्यालय अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे या दोषी विद्यार्थ्यांवर महाविद्यालयाकडून कारवाई होईल अशी आशा बाळगतो. जर आपण त्यांच्या चुकांवर पांघरुण घातले तर मात्र आम्ही आमच्या स्टाईलने धडा नक्की शिकवू हे मात्र आपण ध्यानात ठेवावे,” असे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, आम्हाला हा रैगिंगचा प्रकार दिसत नसला तरी संबधित विद्यार्थ्यांची महाविद्यालयांतर्गत चौकशी होत आहे आणि त्यासाठी महाविद्यालयाची समिती याची माहिती घेत आहे. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे असून दोन दिवसांत रिपोर्ट आल्यावर दोषी विद्यार्थ्यांवर महाविद्यालय स्तरावर निश्चित कार्यवाही होईल, असे आश्वासन प्राचार्य श्री. पाटील यांनी आम्हाला दिले असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button