
रत्नागिरी शहरातील नवीन जलवाहिनी वादात, कोट्यावधींची जलवाहिनी पुन्हा फुटली
रत्नागिरी शहरवासियांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून राबवण्यात आलेली नवीन नळपाणी योजना आता पांढरा हत्ती ठरू लागली आहे. शहरातील वर्दळीच्या मारूती मंदिर परिसरात नवीन जलवाहिनीला दोन ठिकाणी मोठी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. सोमवारी सकाळी सुरू झालेले हे दुरूस्तीचे काम उशिरापर्यंत सुरूच होते.
वारंवार फुटणार्या या जलवाहिनीमुळे नगर परिषदेच्या पाणी पुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाला असून शहरवासियांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मारूती मंदिर परिसरातील साक्षी फूडसमोर गेल्या काही दिवसांपासून जमिनीखालून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर निचरा होत होता.
रस्त्यापेक्षा सखल भागात असलेल्या दुकानांच्या भिंतीना आणि पायथ्याला हे पाणी लागल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर सोमवारी नगर परिषदेने जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले असता, नवीन जलवाहिनीला दोन ठिकाणी भगदाड पडल्याचे दिसून आले. नगर परिषदेतर्फे तातडीने या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.
www.konkantoday.com



