
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी-वझरवाडी येथे कारचा भीषण अपघात; चौघे जखमी
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी-वझरवाडी परिसरात शुक्रवारी (१७ जुलै) सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी GA 06 K 0618 क्रमांकाची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत दिव्याच्या खांबावर जोरात आदळली.
धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान झाले असून वाहनातील चारही प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धाम यांच्या भरणे नाका येथील २४ तास कार्यरत विनामूल्य रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कशेडी वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढून प्राथमिक उपचार देण्यात आले.
त्यानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मनीषा केशव खवणेकर (४४), केशव एकनाथ खवणेकर (५१), स्वरा केशव खवणेकर (५) आणि सुजाता महादेव कोचरेकर (५७), सर्व रा. गोवा, हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.




