
तांत्रिक कारणास्तव रत्नागिरीत होणारे १०० वे नाट्यसंमेलन लांबणीवर
रत्नागिरीतील नाट्यप्रेमी ज्या क्षणाची दीड वर्षापासून वाट पाहत होते, तो मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. येत्या २४ एप्रिल रोजी होणारे १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आले असून, आता नवीन तारखांकडे सर्व नाट्यरसिकांचे लक्ष लागले आहे.
नाट्यसंमेलनाचे सांगता सत्र भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यासाठी रत्नागिरी शाखेच्या पदाधिकार्यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेकडे अधिक वेळ मागून घेतला आहे. संमेलनाची तयारी अधिक चोख व्हावी आणि कोकणच्या संस्कृतीचे दर्शन जगात घडावे, यासाठी हा वेळ आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. ही विनंती रास्त मानून नाट्य परिषदेने संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिषदेचे कार्यवाह अजित भुरे यांनी दिली आहे.
या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल भूषवणार आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत १०१ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, जोपर्यंत रत्नागिरीतील १०० व्या संमेलनाचे सांगता सत्र पार पडत नाही, तोपर्यंत १०१ व्या संमेलनाचे (बोरिवली) आयोजन करणे शक्य नसल्याने संपूर्ण वेळापत्रकावरच आता परिणाम झाला आहे, लवकरच नियामक मंडळाची विशेष सभा बोलावली जाईल. या सभेमध्ये रत्नागिरीतील संमेलनाच्या नवीन तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात येईल रत्नागिरीचे वेळापत्रक ठरल्यानंतरच बोरिवली येथील पुढील संमेलनाची पावले उचलली जाणार असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाह अजित भुरे यांनी स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com




