
कोकणातील जाणकारांसमोर नाटक करणे हे वेगळेच आव्हान : लेखक, दिग्दर्शक अभिनेता संतोष पवार
“कोकणातला प्रेक्षक खूप चोखंदळ, दर्दी आणि नाटक वेडा आहे. हनुमान जयंती उत्सवाला मुंबईतून ही मंडळी नाटके बोलवतात. इथली माणसे स्वतःही कलाकार असून, त्यांना नाटकाची जाण आहे. नाटक कसं बघायची कला आहे आणि ती कला त्यांना अवगत आहे. अशा माणसांसमोर नाटक करताना एक वेगळेच आव्हान असते ते आम्ही अनुभवतोय ती मजा घेतोय,” असे प्रतिपादन लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता संतोष पवार यांनी केले.
हनुमान जयंती महोत्सवानिमित्त “हीच खरी फॅमिलीची गंमत आहे” या नाट्यप्रयोगासाठी चिपळूण तालुक्यातील निवळी कोष्टे वाडी येथे लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता संतोष पवार आले असता त्यांनी प्रतिनिधीशी संवाद साधला. आगामी आकर्षण काय याबाबत बोलताना ते म्हणाले की, सध्या रंगभूमीवर माझे दोन-तीन प्रयोग चालू आहेत. “हीच खरी फॅमिलीची गंमत आहे” हे नाटक जोरदार चालू आहे. महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग होत आहेत. “यदा कदाचित रिटर्न्स” आणि “दमयंती दामले” ही नाटके सुरू आहेत. आता मी आणि विनय खेडेकर एक रॉयल थिएटर्सची निर्मिती करतोय जे २० वर्षापूर्वी आले होते. आमचा मित्र अतुल परचुरे आज आपल्यात नाही; मात्र त्याला घेऊन त्यावेळी आम्ही हे नाटक केले होते, तेव्हा याचे खूप धुवांधार प्रयोग झाले होते आणि २० वर्षांनी पुन्हा हे नाटक करतोय त्यामुळे ती एक उत्सुकता आहे. लवकरच कोकणात येऊ आम्ही. कोकण म्हणजे नाट्य वेडा प्रदेश आहे.”
ही कला जपा, असा संदेश देतानाच संतोष पवार यांनी तुमची सेवा करण्यासाठी नाट्यप्रयोगासाठी पुन्हा कोकणात येऊ, असे आश्वासन दिले.




