
रत्नागिरीत पुरवठा विस्कळीत झाल्याने टंचाई पेट्रोलसाठी पुन्हा रांगा
रत्नागिरी : पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने मागील दोन दिवसांपासून शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी दिसत आहे. अशातच काही पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याचे फलक झळकल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र प्रशासनाने पेट्रोलचा कोणताही तुटवडा नसल्याचे जाहीर केले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
इस्रायल, अमेरिकेकडून सातत्याने इराणवर हल्ला केला जात आहे. इराणनेही प्रत्युत्तर देत आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकेन लष्करी तळांवर हल्ले केले. युद्धाचा परिणाम म्हणून अनेक तेलवाहू जहाज अडकून राहिल्याने जगभरातील कच्चा तेलाची पुरवठा साखळी खंडित झाली आहे. अशातच आता भारतासह जगभरातील देशांमध्ये कच्च्या तेलाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढण्याची किंवा इंधन संपण्याची अफवा पसरली आहे. यापूर्वी देखील यासंबंधीचे संदेश समाज माध्यमांवर पसरले झाले आणि त्यामुळे शहरांमधील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा रत्नागिरीतील पेट्रोल पंपावर वाहन धारकांनी गर्दी सुरू केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक वाहनधारक वाहनांमध्ये पेट्रोल भरून ठेवण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे शहरातील पेट्रोलपंपावर वाहनांच्या लांब रांगा दिसत आहेत.




